सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केले; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत.हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय असून,मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीने पावले उचलायला हवीत,सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केले आणि त्यांची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल.त्या परिस्थितीत मनसे मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीने सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, त्यांनी मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी केली आहे.मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरु आहेत. सर्वांना घरून काम करता येणे शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे.त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे.अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरु आणि लोकल बंद याने नेमकं काय साध्य होणार ? असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.कोरोनाची साथ एकाएकी जाणार नाही असे जगातल्या तज्ञांचे मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथींबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे, आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी.पण दिसतंय असे की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही असा टोलाही त्यांनी या पत्राच्या माध्यमातून लगावला आहे.

महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीने पावले उचलायला हवीत, सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केले आणि त्यांची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल.त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीने सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा,निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीने सुरु केली जावी, विविध प्रकारच्या मोहीमा हातात घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील आणि मुंबईचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Previous articleयेत्या आठवड्यात लोकल सुरू करा ! अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा प्रविण दरेकरांचा इशारा
Next articleअजितदादा म्हणजे राजकारणातील परखड माणूस : चंद्रकांत पाटील यांनी केली स्तुती