पाचवी ते दहावीपर्यंत सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा; अन्यथा १ लाखांचा दंड

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय शाळा आणि खासगी शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वी जारी केलेल्या शासन आदेशात सुधारणा करून त्यात मराठी भाषा सक्तीचा असे स्पष्टपणे नमूद करत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन शासन निर्णय जारी केला.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्याचे आदेश जारी केले होते. इयता ५ वी ते दहावी पर्यंतच्याच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय (व्दितीय) शिकवण्याबाबत आदेशात नमूद केले होते. त्यात मराठी विषय सक्तीचा असा उल्लेख नव्हता. त्यामुळे अनेक शाळांनी शासन आदेशाचा फायदा घेतला आणि मराठी विषय दुस-या क्रमांकावर शिकवण्यास सुरूवात केली.मराठी भाषेला प्राधान्य दिले जात नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे शिक्षण विभागाने पूर्वीच्या शासन निर्णयात सुधारणा केली आणि मराठी विषय सक्तीचा असे नमूद केले. परिणामी आता राज्यातील सर्व परिक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमाच्या शासकीय व सर्व खासगी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा झाला आहे.नव्या निर्णयामुळे राज्यातील सर्व खासगी इंग्रजी, हिंदी व अन्य भाषिक शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य होणार आहे. मराठी विषय सक्तीच्या या कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास शाळेच्या व्यवस्थापनाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे.

Previous articleदुर्देवाने आज १०० टक्के राजकारण केले जातयं : मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
Next articleकार्यकर्त्यांना खुशखबर : महामंडळावरील नियुक्त्या येत्या १५ दिवसात जाहीर करणार