१ ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे १० रूपयाला मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या काळात गरीब व गरजू लोकांना जेवणा अभावी हालअपेष्ठा सहन कराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात आल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला आहे.येत्या १ ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे १० रूपयाला मिळणार आहे.तसेच पार्सल सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती.या टाळेबंदीत गरीब व गरजू लोकांना जेवणाअभावी हालअपेष्ठा सहन कराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने या योजनेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.कोरोनाच्या काळात या योजनेचा लाखो गरजूंना लाभ मिळाला आहे.या योजनेचा गरीब व गरजू लोकांना मोठा आधार मिळाला होता.मात्र सध्या राज्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत.त्यामुळे शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे १० रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार येत्या १ ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे १० रूपयाला मिळणार आहे.शिवाय यापूर्वी सुरू असणारी पार्सल सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous articleपक्षनिष्ठा : काँग्रेससाठी शरद पवारांनी केला थोरल्या बंधूंच्या विरोधात प्रचार
Next articleबापरे…मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्या विरोधात १ हजार कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा