त्यावेळेस आर.आर.आबांच्या डोळ्यातून आले अश्रू ..रोहितने व्यक्त केल्या भावना

मुंबई नगरी टीम

सांगली । राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील ( आबा) यांचे ज्येष्ठ बंधू राजाराम (तात्या) पाटील हे सेवानिवृत्त झाले.त्या पार्श्वभूमीवर आर.आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी त्यांच्या चुलत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत फेसबुक पोस्ट केली आहे.भरती पूर्व परीक्षेत पास झाल्यानंतर ज्यावळेस ही बातमी त्यांनी ( राजाराम पाटील) आबांच्या कानावर घातली होती. त्यावेळेस आबांच्या डोळ्यातून अश्रू आलेला किस्सा नमूद केलाय.

आर.आर.पाटील यांचे मोठे बंधू आणि रोहितचे चुलते डी.वाय.एस.पी राजाराम (तात्या) पाटील हे सेवानिवृत्त झाले सेवेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या मातोश्रींना सॅल्यूट करून सेवानिवृत्ती घेतल्याचे फोटो समाज माध्यमांत व्हायरल झाले आहेत.आपल्या चुलत्यांबद्दलच्या आठवणींना रोहितने फेसबुकच्या माध्यमातून उजाळा दिलीय.व्यक्तिगत माझ्या आयुष्याला बहुतांश आकार आणि शिकवण ज्यांनी दिली त्या तात्यांची आज सेवानिवृत्ती.कुटुंब म्हणून आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे. आणि त्याची पार्श्वभूमी सुध्दा काहीशी तशीच आहे. सुरुवातीच्या काळात भरती पूर्व परीक्षेत पास झाल्यानंतर ज्यावळेस ही बातमी त्यांनी आबांच्या कानावर घातली होती त्यावेळेस आबांच्या डोळ्यातून अश्रू आलेला किस्सा आज सुध्दा सांगताना त्यांचे डोळे भरून येताना मी पाहिले आहे.घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून आबांना सुध्दा नेहमी त्यांचा अभिमान होता अशी आठवण त्यांनी या माध्यमातून मांडलीय.

आबा गृहमंत्री असताना कधीही गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता त्यांनी काम केले आणि नेहमीच त्यांनी ते अंतर ठेऊन काम केले. सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही हे मात्र अगदी ठळकपणे सांगायला मला आवडेल. कधी कधी त्यांच्या सेवा काळाबद्दल विचार केला तर गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून काम करताना त्याचे काही तोटे सुध्दा असू शकतात हे लक्षात येते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांनी तयार केलेला लोकांचा संग्रह आणि तेथील लोकांना त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी हीच त्यांच्या कामाची पोच पावती आहे असे मला नेहमी वाटतं. आज सेवेत असताना शेवटचे ऑफिसकडे जाताना त्यांना खूप कष्ट करून शिकवलेल्या माझ्या आज्जीला सॅल्यूट करून ते रवाना झाले. आर आर आबांचा मुलगा म्हणून जेवढा अभिमान आहे तितकाच आभिमान डी.वाय.एस.पी आर. आर. तात्यांचा पुतण्या म्हणून आहे आणि राहील एवढच आजच्या दिवशी मला त्यांना सांगायचंय असं रोहितने म्हटले आहे.

Previous articleपरमवीर सिंह यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली का ?
Next articleछगन भुजबळांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले : जयंत पाटील यांचा घणाघात