छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले : जयंत पाटील यांचा घणाघात

मुंबई नगरी टीम

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून त्यांना निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज नाशिक जिल्हयात दाखल झाली आहे.नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी जयंत पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला.लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होत आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जातोय, हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून त्यांना निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा ? असा सवाल त्यानी यावेळी केला.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत भुजबळांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. भुजबळांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे. आपले फक्त ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे, असे पाटील यांनी सांगितले. भुजबळ साहेब अफाट काम करत आहेत. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. आपले संघटन मजबूत असेल तेव्हा हे शक्य होईल, असेही पाटील म्हणाले.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला ते भुजबळांच्या पाठपुराव्याने,त्यामुळे भुजबळांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून पाऊस जरा जास्तच पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहत आहे. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

Previous articleत्यावेळेस आर.आर.आबांच्या डोळ्यातून आले अश्रू ..रोहितने व्यक्त केल्या भावना
Next articleराजकीय नेत्यांचीही जनजागृती व्हायला हवी..मुख्यमंत्र्यांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान