समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केला खळबळजनक आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.तसेच आपल्याला,व मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा खळबळजनक आरोपही केला आहे.

समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या की,राज्य सरकारकडून आम्हाला संरक्षण मिळाले आहे. त्यानंतरही आम्हाला धमक्यांचे सत्र सुरुच आहे,समीर वानखेडे सत्याच्या मार्गाने देशाची सेवा करत आहेत.ते अनेकांना खटकते,असा बचाव क्रांती रेडकर यांनी केला.तसेच आपले पती समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत. समीर सत्याच्या मार्गाने जात आहेत. ते अनेकांना खटकतं. पुरावे असतील तर या लोकांनी न्यायालयात जावे. समाज माध्यमांवर आरोप करुन काय होणार, असा दावा रेडकर यांनी केला. या प्रकरणातून समीर बाहेर पडतील. नेहमी सत्याचा विजय होतो. मला काहीही काळजी वाटत नाही. समीर हे निर्दोष आहेत,असे रेडकर म्हणाल्या.

नवाब मलिक यांना वेळच उत्तर देईल,आम्हाला समाज माध्यमांवर निशाणा बनवले जात आहे. आपत्तीजनक भाषेत वक्तवे केली जात आहेत. या सगळ्याचा मानसिक त्रास होत आहे. पण, मराठी असल्याचा अभिमान आहे, असे रेडकर यांनी सांगितले.यावेळी समीर यांची बहिण व मनसे पदाधिकारी जास्मिन वानखेडे उपस्थित होत्या. नवाब मलिक यांच्याकडे खरोखरच पुरावे असतील तर न्यायालयात जावे. समाज माध्यमांवर आरोप करुन लोकांचा वेळ वाया घालवू नये, असा सल्ला जास्मिन यांनी दिला.

Previous articleदिवाळीच्या तोंडावर एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ;तिकिटात किमान ५ रूपयांची वाढ
Next articleनगरसेवकांची संख्या वाढली; वाचा : कोणत्या महापालिकेत किती असतील नगरसेवक