मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल ; राज्यातील जनतेला केली महत्वाची विनंती

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेचे दुखणे बळावल्याने ते आज उपचारासाठी रूग्णालयात दाखल होणार आहेत.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केलेल्या निवेदनात याची माहिती दिली.या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या पालखी मार्ग कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानेला पट्टालावून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चर्चा सुरू झाली होती.आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे यांची माहिती राज्यातील जनतेला दिली आहे.यानिवेदनात मुख्यमंत्री म्हणतात..माझ्या बंधू, भगिनींनो आणि मातांनो..जय महाराष्ट्र!, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत.एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकास कामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच !पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.

राज्यातील जनतेला आपल्या दुखण्याची माहिती देत असतानाच त्यांनी राज्यातील जनतेला महत्वाची विनंतीही केली आहे.यानिमित्ताने एकच सांगायचे आहे.कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो असेही शेवटी त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Previous articleखुशखबर : २ हजार ८८ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता ; मंत्री उदय सामंतांची घोषणा
Next articleमंत्रिमंडळाचा निर्णय : मुंबई महानगरपालिकेत ९ नगरसेवक वाढणार