मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा! नाना पटोले यांचे फर्मान

मुंबई नगरी टीम

मुंबई । नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून देश ५० वर्षे मागे गेला आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहेत. भाजपच्या या षडयंत्राला बळी न पडता भाजप आणि मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करा, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केले .

टिळक भवन येथे आज राज्यातील सर्व कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आणि सेलचे अध्यक्ष यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना पटोले यांनी भाजपवर टीका केली. भारत हा तरुणांचा देश आहे. पण या तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात मोदी सरकार अयपशी ठरले आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन हवेतच विरले. उलट खासगीकरणामुळे देशातील २ कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या कमी झाल्या. आता तर देशातील ४५ कोटी नोकरी इच्छुक तरुणांनी नोकरीची आशाच सोडून दिली आहे . महागाई, शेतकरी, कामगारांचे प्रश्नही आहेत. या सर्व प्रश्नांवर मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणूनच धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरु आहे. मात्र भाजपच्या या षडयंत्राला बळी पडू नका. त्याला चोख उत्तर देत मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा, असे पटोले म्हणाले.

काँग्रेस सर्वात जुना आणि अनुभवी पक्ष आहे. काँग्रेसला माननाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे त्यांच्यापर्यंत पोहचण्याची गरज आहे. डिजीटल सदस्य नोंदणीच्या माध्यमातून घरा-घरात जाऊन लोकांना काँग्रेसशी जोडा. आतापर्यत झालेली सदस्य नोंदणी समाधानकारक असली तरी अजूनही काही भागात सदस्य नोंदणीवर भर देण्याची गरज आहे. ‘गाव तिथे काँग्रेस’ हा आपला संकल्प असून या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊ शकतो. प्रत्येक बुथवर किमान २५ सदस्यांची नोंदणी करा. आपले लक्ष्य २०२४ च्या निवडणुका आहेत. त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करा, असे आवाहनही त्यांनी केले.या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, सुनील देशमुख, प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, कॉंग्रेसचे सचिव आशीष दुआ, सोनल पटेल आदी उपस्थित होते.

Previous articleशरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा ; महत्वाच्या मुद्द्यावर झाली चर्चा
Next articleराज ठाकरे हे स्वत: ला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत : उद्धव ठाकरे गरजले