हे केवळ घाबरलेला हुकूमशाहच करु शकतो…. नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली असून काँग्रेसला देशभरातून जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्यानेच मोदी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छत्तिसगडच्या रायपूर येथे काँग्रेसचे महाअधिवेशन होत असून या अधिवेशनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना रायपूरला जात असताना विमानातून खाली उतरवून अटक करण्यात आली हे केवळ घाबरलेला हुकूमशाहच करु शकतो, पण कितीही अडथळे आणले तरी महाअधिवेशन होणारच असा निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना रायपूरला जाण्यापासून रोखत अटक केली याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध व्यक्त करत केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. नरेंद्र मोदी सरकारने देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवले असून हुकूमशाही कारभार सुरु आहे. काँग्रेसच्या रायपूर येथे होत असलेले महाअधिवेशन सुरुळीत पार पडू द्यायचे नाही असा चंग बांधूनच सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नाहक त्रास दिला जात आहे. रायपूरमधील काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले, त्यात त्यांना काहीच मिळाले नाही. आज दिल्लीहून काँग्रेसचे अनेक नेते रायपूरला अधिवेशनासाठी जात असताना राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर विमानातून खाली उतवले, तिथेच काँग्रेस नेत्यांनी विरोध करत घोषणाबाजी केली त्यानंतर आसाम पोलीसांची तक्रार असल्याचे सांगत पवन खेडा यांना अटक केली. मोदी सरकारची ही कृती अत्यंत निषेधार्ह व लोकशाही मुल्ये पायदळी तुडवणारी आहे.

मोदी सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून विरोधी पक्षांना दडपशाहीच्या मार्गाने संपवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अशा कारवायांना भीक घालत नाही. एकेकाळी जगातील बलाढ्य शक्ती असलेल्या जुलमी ब्रिटिशांना काँग्रेसने देश सोडण्यास भाग पाडले हे मोदी सरकारने लक्षात ठेवावे. मोदी सरकारची कृती हूकूमशाही प्रवृत्तीचीच असून या प्रवृत्तीचा मुकाबला काँग्रेस पक्ष करेल, असेही पटोले म्हणाले.

Previous articleतुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे आता जोमाने तयारीला लागा ! शरद पवार
Next articleसंजय राऊतांच्या अडचणीत वाढ ; राऊतांच्या वक्तव्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेत नक्की काय घडले !