..तर एसटीच्या एमडींच्या कार्यालयाला टाळे ठोकू ; प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी सरकारचा समज असेल की, कर्मचा-यांवर दबावशाही करुन त्यांना जबरदस्तीने कामावर रुजु व्हायला लावू व एसटी कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करु. तर सरकार मुर्खाच्या नंदनवनात वावरते आहे. कुठलीही जोर जबरदस्ती एसटी कर्मचा-यांवर करु नका. जर अश्या जबरदस्तीने एसटी कर्मचा-यांचे आंदोलन पेटले तर त्याला सरकार जबाबदार असेल. जर सरकारने येत्या दोन-तीन दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर एसटीच्या एमडींच्या कार्यालयाला टाळे ठोकून एसटीचा सर्व कारभार ठप्प करु असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.

आझाद मैदानात आंदोलनला बसलेल्या एसटी कर्मचा-यांची प्रविण दरेकर यांनी आज भेट दिली. यावेळी आमदार गोपीचंद पडाळकर, सुनिल गणाचार्य आदी उपस्थित होते. याप्रसंगी दरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील सर्व एसटी डेपो कडेकोट बंद आहेत. आता डेपो मँनेजर व अधिका-यांनी आंदोलनाला समर्थन दिले आहे.त्यामुळे आता तरी झापेचे सोंग घेतलेल्या सरकारने जागे यावे व या कर्मचा-यांना न्याय दयावा. अशी आम्ही सरकारला नम्र विनंती करतो असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.संजय राऊत व अजित पवार यांची विधाने आश्चर्यकारक असल्याचे नमूद करताना दरेकर यांनी सांगितले की, एसटी कर्मचा-यांना आधार द्यायचे सोडून जे कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत त्यांना हेच नेते सांगत आहेत की, आंदोलन मागे घ्या. पण यामधून समन्वय काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होत नाही. आदरणीय शरद पवार साहेब यांनी एसटीच्या अधिवेशनात एसटी विलिनीकरण करण्याची जबाबदारी घेतल्याचे जाहिर केले होते. १५ दिवसात यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले होते. अजित दादा यांची मी जबाबदारी घेतो. मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांची जबाबदारी घ्यावी अशी घोषणाही केली. मग त्या घोषणेचे काय झाले असा सवालही दरेकर यांनी केला.

सरकार रोज अफवा पसरविण्याचे काम करीत आहे. एसटीचे दरदिवशी १५० कोटी नुकसान होत असल्याचे सांगत आहे. एसटीचे कर्मचारी कामावर येण्यास सुरुवात झाली अशी अफवा पसरवित आहे असे स्पष्ट करताच दरेकर म्हणाले की, मग सरकार एसटीचे नुकसान वाढवित जाणार आहे का. सरकारचा अहंकार व प्रतिष्ठा एसटीच्या नुकसानीपेक्षा मोठी आहे का.जर सरकारचे नुकसान होत असेल तर एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय लवकर जाहिर करा. तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकाने या विषयाच्या संदर्भात काय केले याचा अभ्यास करा व निर्णय घ्यावा असे आवाहन दरेकर यांनी केले.राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या न्याय मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. गावा गावातून मुंबईत आलेले सर्व कर्मचारी दिवस रात्र या आंदोलनात सहभागी झाले आहे. त्या कर्मचा-यांना जी मदत लागेल ती मदत मुंबईकरांनीही त्यांना उत्स्फूर्तपणे द्यावी. त्यांना आधार द्यावा व एसटी कर्मचा-यांच्या लढ्याला पाठबळ द्या अशी विनंतीही दरेकर यांनी यावेळी केली.

Previous articleविधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी संजय केनेकर विरूद्ध डॉ. प्रज्ञा सातव यांच्यात लढत
Next articleउद्धव ठाकरेंना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही : फडणवीसांचा घणाघात