मुंबई नगरी टीम
मुंबई । इंडिया आघाडीतून नितीश कुमार, आप आणि ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडली आहे. समाजवादी पक्षाने १६ जागांवर उमेदवार जाहीर केले असल्यामुळे महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये हे आज झालेल्या बैठकीत ठरले आहे.याबाबत दक्षता घेऊ. त्यामुळे ताक जरी असले, तरी फुंकून फुंकून प्यायचे असे मी ठरवले आहे अशी सावध भूमिका महाविकास आघाडीत सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक येथिल एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीत नव्याने सहभागी झालेले बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.या बैठकीनंतर आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीसारखी होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली असून,पुढील बैठकीत जागा वाटपावर चर्चा करणार असल्याचे आंबेडकर स्पष्ट केले.राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी उरली नाही.इंडिया आघाडीतून नितीश कुमार, आप, ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडली आहे.समाजवादी पक्षाने १६ जागांवर उमेदवार जाहीर केले असल्याने महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.