अमरावती दंगल प्रकरणी शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल; मोदींवर साधला निशाणा

मुंबई नगरी टीम

गडचिरोली । अमरावती दंगलीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.आज सांप्रदायिक,जातीवादाला खतपाणी घालणारा विचार जाणीवपूर्वक वाढवला जात असून,त्रिपुरातील घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटले.तिपुरात काही घडल्यानंतर त्याची किंमत इथल्या लोकांनी का चुकवावी ? असा सवाल करतानाच ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत त्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही तेल ओतून आग वाढविण्याची होती अशा शब्दात पवार यांनी हल्लाबोल केला.

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीला मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्रिपुरातील घटनेवरून भाजपवर निशाणा साधला.आज सांप्रदायिक,जातीवादाला खतपाणी घालणारा विचार जाणीवपूर्वक वाढवला जात आहे.त्रिपुरातील घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटले.तिथे काही घडल्यानंतर त्याची किंमत इथल्या लोकांनी का चुकवावी ? ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत त्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही तेल ओतून आग वाढविण्याची होती असा आरोप त्यांनी यावेळी केला.त्रिपुरातील घटनेचे पडसाद अमरावतीत आपण पाहिले.म्हणून सांप्रदायिक,जातीय तेढ आणि माणसा-माणसांत अंतर वाढविणारा,द्वेष पसरविणारा विचार जे लोक पसरवत आहेत,त्यांना खड्यासारखे बाजूला ठेवणे तुमचे कर्तव्य आहे.आदिवासी समाज या चुकीच्या प्रवृत्तींना कधीही साथ देणार नाही असेही पवार म्हणाले.

आदिवासी तरुणांना प्रगतीपथावर आणण्यासाठी असलेल्या योजनांवर लक्ष देण्याची गरज आहे. आदिवासी वर्गामध्ये विकासात्मक बदल करण्याचा पक्षाचा विचार आहे.गेल्या वर्षी इंदौरला आम्ही मोठी आदिवासी परिषद घेतली. त्यानंतर नागपूरलाही मोठा कार्यक्रम घेतला.मागील आठवड्यात नाशिकमधील आदिवासीबहुल इगतपुरी तालुक्यात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी जमलो होतो.भांगरे यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते. हा त्याग आदिवासी कुटुंब करु शकते म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे पवार यांनी सांगितले. आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत.दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण त्यांनी तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी त्यांनी वनवासी असा शब्द वापरला. हा शब्द आदिवासींना मंजूर नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.”आम्ही मूलनिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका”,असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे.आज आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर वनसंपत्ती,जंगल याचे रक्षण केले गेले पाहीजे. आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टींचे संवर्धन करत आहे असेही पवार यांनी सांगितले.

राज्यात, देशात जे जलसंपदा प्रकल्प झाले,त्यात जास्तीत जास्त आदिवासींची जमीन गेली. आदिवासींच्या क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा झाला आणि त्याचा फायदा इतर क्षेत्रांना झाला. पर्यावरणाची राखण करणारा वर्ग म्हणून आदिवासींची ओळख असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असला पाहीजे.शेती हा आपला महत्त्वाचा धंदा आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ८०% लोक शेती करत होते. आज देशाची लोकसंख्या १०० कोटींच्या पुढे गेली व शेती करणाऱ्यांची संख्या ६०% झाली. याचा अर्थ शेती करणाऱ्यांची संख्या कमी झाली. विकासासाठी जमिनी वापरल्या गेल्यामुळे साहजिकच शेतीसाठीची जमीन कमी होत गेली.म्हणून या वर्गाला मदत करणारे धोरण आखणे गरजेचे आहे. धानाला बोनस देण्याची भूमिका खासदार प्रफुल पटेल यांनी मांडली असे सांगून,महाविकास आघाडीने दोन वर्षे बोनस दिला.मात्र कोरोनानंतर बोनस देणे अवघड झाले. केंद्राकडून जीएसटीचा परतावा मिळाला नाही. तरीही शेतकऱ्यांच्या धानाला काही ना काही बोनस मिळाला पाहीजे.यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषी मंत्री आणि विदर्भातील मंत्र्यांशी एकत्र चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची असली तरी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज थोडे कमी करा,अशी आमची सरकारला विनंती असेल.गेले वर्षभर देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.ऊन, थंडी, पाऊस याचा विचार न करता आपल्या मालाला योग्य किंमत मिळावी म्हणून शेतकरी आंदोलन करत आहेत.जो शेतकरी सर्वांच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सोडवतो, त्याने काही मागणी केली तर केंद्र सरकार तिकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. संसदेच्या पुढील अधिवेशनात हा प्रश्न आम्ही सरकारपुढे मांडणार असून, सरकारने दखल घेतली नाही तर दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले आंदोलन देशात इतर ठिकाणी करावे लागेल असा इशारा पवार यांनी दिला.राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे.विदर्भात राष्ट्रवादीला कमीत कमी तीन मंत्री तरी मिळावेत अशी इच्छा होती. पण आम्हाला ते मिळू शकले नाहीत, कारण जागा कमी होत्या.आमची इच्छा ही की होती तिसरी जागा धर्मरावबाबा आत्राम यांना द्यावी.याआधी त्यांनी मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे.पण जागा कमी असल्यामुळे त्यांना जागा देता आली नाही, हे दुःख आमच्या मनात आहे. ते दुःख आम्ही कधी ना कधी दूर करु. पुढच्या निवडणुकीत धर्मराव बाबांना लोकसभेला पाठवायचं आणि भाग्यश्रीला विधानसभेत निवडून द्यायचं असेही पवार यावेळी म्हणाले. सरकार बनल्यानंतर जिल्हा परिषदेचा अनुभव असल्यामुळे भाग्यश्री यांना अधिक काम करण्याची संधी राज्य पातळीवर द्यावी, अशी पक्षाची इच्छा आहे. त्याला इथल्या जनतेची साथ मिळेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जि.प, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या जागांपैकी ५० टक्के जागांसाठी सर्वसाधारण कुटुंबातील महिलांना संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Previous articleशिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रीपद देवून राज्यात पुन्हा भाजप सेनेचे सरकार : आठवलेंनी मांडले गणित
Next articleग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या २१ डिसेंबरला मतदान