राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उद्या दिल्लीत राष्ट्रवादीची महत्वाची बैठक

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार दिनांक ७ डिसेंबर रोजी दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दुपारी ही महत्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत पक्षातंर्गत होणा-या निवडणूका कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विशेष निमंत्रित,कार्यकारिणी सदस्य आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत युपीए किंवा ममता बॅनर्जी हा मुद्दा नसून फक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

यावेळी मलिक यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले.ज्यांचे आरक्षण विरोधी धोरण राहिले आहे तेच या देशात आता नवीन वाद निर्माण करत आहेत मात्र कुठलेही आरक्षण मग ते एससी एसटी आणि ओबीसी या आरक्षणाला बाधा येणार नाही ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे असे मलिक यांनी स्पष्ट केले.ओबीसी आरक्षणाशिवाय कुठलीही निवडणूक नको ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. राज्यात कायदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारीत करण्यात आला व त्याचा अध्यादेश निघाला. तसे कायदे देशातील अनेक राज्यात करण्यात आले आहेत त्या धर्तीवर हा कायदा करण्यात आला आहे मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्यांच्या निरीक्षणाचा अभ्यास करण्यात येईल असे मलिक यांनी सांगितले.मंडल आयोगाच्या शिफारशी या देशात लागू झाल्यानंतर २७ टक्के आरक्षण हे त्या काळातील सरकारने निर्णय घेऊन दिल्या. त्याला सुप्रीम कोर्टात लोकांनी आव्हान दिले होते. या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. नोकरीसाठी, शिक्षणासाठी क्रिमिलेअरची अट टाकण्यात आली होती पण राजकीय आरक्षणाला कुठल्याही प्रकारची अट नव्हती असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

५० टक्क्याच्या मर्यादेच्याखाली जिथे आदिवासी समाजाची लोकसंख्या जास्त असेल त्यांच्या आधारावर त्यांना आरक्षण मिळेल. त्या जिल्हयात ५० टक्क्याच्या आत एससी, एसटी चे आरक्षण वगळता जे शिल्लक असेल त्या जिल्हयात ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देण्याचा कायदा करण्यात आला. या कायद्याला काहींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. आज या कायद्याला स्थगिती दिली आहे. मात्र या आदेशाचा अभ्यास करून जे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे त्याचा अभ्यास होईल आणि राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचे मलिक यांनी सांगितले.काही लोकांना ओबीसींवर अन्याय करायचा आहे. देशातून आरक्षण संपले पाहिजे अशी मानसिकता असणारी लोकं वारंवार मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयीन लढा लढत आहेत. त्या सगळ्या लोकांच्यामागे एका विशिष्ट विचारधारेची लोकं आहेत असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

Previous articleसंजय राऊत यांच्यासह ६ राज्यसभा खासदारांची मुदत जुलै मध्ये संपणार
Next articleचाचण्यांचे दर पुन्हा कमी : कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता ३५० रुपयांत