शरद पवार यांनी साधला भाजपवर निशाणा …काय म्हणाले पवार !

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत.राजकारणात चढउतार असतात.हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात.पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले.

आज परभणी,वर्धा, नांदेड,पुणे येथील अनेक भाजप,वंचित आणि आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.यावेळी शरद पवार म्हणाले की,गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसापूर्वी भाजपचे नेते सांगत होते,उत्तरप्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही.पण आज एक दिवस असा जात नाही,जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत.पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्या पिढीला,सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन एक प्रभावी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न होईल.उर्वरीत महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मजबूत करण्याचे काम होईल,अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली.१४ जानेवारी हा दिवस माझ्या अंत:करणात कायमचा राहतो.या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय घेतला,तो माझ्या स्वाक्षरीने झाला होता.त्याच्या पुर्वसंध्येला आज प्रदेश कार्यालयात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे असेही पवार म्हणाले.

फुले-शाहू-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आधारीत समाजकारण करण्याची आवश्यकता आहे.चुकीच्या विचारांकडे जे लोक गेले आहेत.त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्याचे काम विजय गव्हाणे करतील.गव्हाणे हे दोस्तीला पक्के आहेत.त्यामुळेच ते त्यांचे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले.गोपीनाथ मुंडे राजकारणात आमचे विरोधक असले तरी त्यांनी व्यक्तिगत सलोखा कधी सोडला नाही.त्यांचा स्वभाव गव्हाणे यांना भावल्यामुळेच त्यांनी चौकटीबाहेर जाऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.आज आमचे एक सहकारी बापूसाहेब काळदाते हे हयात नाहीत.एक दिवशी मी त्यांच्यासमोर गव्हाणे यांचा विषय काढला होता. काळदाते मला म्हणाले की, गव्हाणे भाजपमधील लोकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतील.जर तिथले लोक शहाणे होत नसतील तर हे तिथून बाहेर पडतील.साहजिकच त्यांनी विचारधारा कधीच सोडली नव्हती.त्यामुळेच ते आज राष्ट्रवादीसोबत आले आहेत असेही पवार म्हणाले.आज भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा होत आहे.म्हणून अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊ इच्छितात असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी म्हणाले.

माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले.येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची रीघ लागेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.परभणी येथील माजी आमदार विजय गव्हाणे, वर्धातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुणे येथील आरपीआयचे नेते प्रदीप साठे, श्रध्दा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे, पैठणमधील किशोर दसपुते आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

Previous articleएक दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका !
Next articleइथे फक्त मराठीच चालणार….राज ठाकरेंचा खणखणीत इशारा