इथे फक्त मराठीच चालणार….राज ठाकरेंचा खणखणीत इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या या मराठीत असाव्यात असा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.आता यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे,देवनागरी लिपी सर्वांना समजते.इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावले आहे. ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरेतर आंदोलन करावे लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला,आंदोलने केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे असे सांगतानच, त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये असेही राज ठाकरे यांनी सुनावले आहे.त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.आणि महाराष्ट्र सरकारचेही अभिनंदन.सरकारला आता मी इतकेच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा.ह्यात आणखी एक भानगड सरकारने करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून.ह्याची काय गरज आहे ? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते.इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा खणखणीत इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

Previous articleशरद पवार यांनी साधला भाजपवर निशाणा …काय म्हणाले पवार !
Next articleअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी धनंजय मुंडेंनी घेतला मोठा निर्णय