मुंबई नगरी टीम
मुंबई । २०१९ मध्ये रिक्त असलेल्या पोलिस शिपाई यांच्या एकूण ५२९७ पदांची भरती प्रक्रिया पुर्ण झाली असून त्यांना नेमणूका देणे बाकी आहेत असे स्पष्ट करतानाच दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २३१ पोलिसांची आणखी भरती करण्यात येईल अशी घोषणा आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत करीत ही भरती करत असताना त्यात कुठलाही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, याचीही काळजी आम्ही घेऊ.पुढील काळात दोन वर्षासाठी आणखी भरती करण्यासाठीचाप्रस्ताव मंत्रिमंडळाला देण्यात येईल अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.
कोरोनामध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. सभागृहात पोलिसांचे थोडे कौतुक होईल, असे वाटले होते.पण तसे झाले नाही. कोरोना काळात ३९४ पोलिसांनी बलिदान दिले. त्या सर्वांना ५० लाखांचे सानुग्राह अनुदान जाहीर केले आहे. राज्यात बलात्कार, पोक्से कायद्यातंर्गत प्रलंबित प्रकरणांना निकाली काढण्यासाठी १३८ जलदगती न्यायालयाची स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. २५ न्यायालये कार्यान्वयीत झाली असून,होमगार्डना काम देण्यासाठी अर्थविभागाकडे प्रस्ताव दिला आहे.पोलिस सेवेत असलेल्या शिपायांना निवृत्त होताना पदोन्नती मिळत नव्हती. त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे.३० वर्षांनंतर प्रत्येक शिपाई, कॉन्स्टेबल निवृत्त होताना सब इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त होईल. त्यामुळे तपासाला अधिकारी मिळू शकतील असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.