धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांना बंदी घाला!

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्रातील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढला जात आहे. त्यामुळे राज्यात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केली. पटोले यांच्या मागणीचा रोख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना याआधी सुपारीबाज म्हटले होते. आता राज ठाकरे यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे फडणवीसच सांगू शकतील. दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात कायदा हातात घेऊन दंगली घडवण्यात आल्या, त्यात कोण लोक होते हे सर्वांनी पाहिले आहे. असे प्रकार करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातही झाले. परंतु महाराष्ट्रातील सक्षम सरकारने त्यांचे हे मनसुबे उधळून लावले, असे पटोले यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

राज्य सरकारने सर्व धर्माच्या धर्मगुरुंना बोलावून चर्चा करावी आणि निर्माण झालेल्या परिस्थितीतून योग्य तो मार्ग काढावा. तसेच महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांवर कारवाई करावी,अशी मागणीही त्यांनी केली. इंधनदरवाढ, महागाईवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करून वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र असून जे लोक राज्यातील सामाजिक एकोपा, शांतता, सौहार्द संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी हिंदू आहे आणि दररोज हनुमान चालिसा म्हणतो, पण त्याचा कधी गाजावाजा करत नाही. प्रार्थना करण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही, असा टोला पटोले यांनी राज ठाकरे यांना लगावला.

धार्मिक द्वेष पसरवून मुख्य मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे हाच भाजपचा अजेंडा आहे. पण त्यांच्या अजेंड्याला जनता बळी पडणार नाही. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला देशभरात एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपचे षडयंत्र आता जनतेला समजले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Previous articleआजारपणातून बाहेर पडताच मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू
Next articleसरकारला उशिरा का होईना पण शहाणपण सुचलय : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर