खासदार नवनीत राणांना कारागृहात पिण्यासाठी पाणी दिले नाही ? गृहमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची रवानगी भायखळा आणि तळोजा कारागृहात केली.त्यानंतर नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मागासवर्गीय असल्याने कारागृहात पिण्यासाठी पाणी देण्यात आले नाही अशी तक्रार केली होती.खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही तरी सुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे त्यानुसार राज्यसरकार माहिती देईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट करणा-या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची रवानगी कारागृहात केल्यावर कारागृहात आपणास मागासवर्गीय असल्याने पाणी देण्यात आली नसल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली होती.त्यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यावर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असता त्यामध्ये वस्तुस्थिती नाही.तरी सुद्धा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना मागवलेल्या अहवालानुसार राज्यसरकार माहिती देईल असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, पोलिस कायद्यानेच काम करत असून कायद्याच्या बाहेर कोणतेही काम करत नाहीत. मुंबई पोलिस उत्तम काम करत असून कायद्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटते, त्यावर ते कार्यवाही करत आहे अशा शब्दात त्यांनी मुंबई पोलिसांच्या कामाबाबत पाठ थोपटली.

औरंगाबाद येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेबाबत औरंगाबादचे पोलिस आयुक्त एक दोन दिवसात बैठक घेऊन त्यावर निर्णय देतील, यासाठी पोलिस महासंचालकांशीही ते चर्चा करणार आहेत असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.काल सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतरही जर कुणाला वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यावर औरंगाबादचे पोलिस आयुक्त निर्णय घेतील. हा त्यांचा अधिकार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

Previous articleदादागिरी करून याल तर आम्हाला दादागिरी कशी मोडायची हे शिवसेनाप्रमुखांनी शिकवलंय !
Next articleराज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल ; काय म्हणाले पवार ?