आ.महेश शिंदेंच्या मागणीनंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी दिले सातारकरांना मोठं गिफ्ट

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला.बेंगळूरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही.मात्र आता सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणार असून व यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारकरांसाठी मोठी भेट दिली आहे.विशेष म्हणजे हा औद्योगिक कॉरिडॉर सातारा जिल्ह्यातील कोरोगाव येथे व्हावा अशी मागणी शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला.शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले.तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी सातारकरांसाठी मोठा निर्णय घेतला.बेंगळूरू -मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केवळ हा निर्णय घेवून मुख्यमंत्री शिंदे थांबले नाही तर त्यांनी यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना यावेळी दिल्या.हा प्रकल्प कोरेगाव मध्ये व्हावा अशी मागणी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे बल्क ड्रग पार्कची सुरूवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या ॲपेक्स ॲथॉरिटीच्या पहिल्या बैठकीत दिली. महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी केलेल्या सूचनेला पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल,अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आजच्या अध्यक्षीय भाषणात दिली.

या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी त्याचप्रमाणे अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, केंद्रीय सचिव आदी दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थिती होते. तर मंत्रालयातून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनबलगन, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिप कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी वाराणसी – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम होण्याबाबत या बैठकीत सूचना केली. हा प्रकल्प राज्याला हितकारी असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी या सूचनेला अनुमोदन दिले. वाराणसी – मुंबई कॉरिडॉर झाल्यास आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल,असे मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्यातील टेक्सटाइल पार्क, मेडिकल पार्क आणि बल्क ड्रग पार्क हे प्रस्तावित असून या पार्क्सला केंद्र शासनाने लवकरात लवकर मान्यता दिल्यास या पार्क्सचे काम जलद गतीने सुरू होऊन राज्याला आणि पर्यायाने केंद्रालाही मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.औरंगाबाद येथील शेंद्रा बिडकीन येथील ऑरिक सिटीला उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी ५५४२ कोटींची गुंतवणूक आली असून ३७५ एकर भूखंड उद्योगांना देण्यात आले आहेत. याठिकाणी ३ लाख लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. पंतप्रधानांनी देखील या प्रकल्पाचे कौतुक केले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.दिघी – माणगाव औद्योगिक क्षेत्र देखील विकसित करण्यात येत असून महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाकडून त्वरित मदत झाल्यास विकासाला चालना मिळेल. याठिकाणी ८५ टक्के जमीन संपादन पूर्ण झाले आहे. कराराची तांत्रिक प्रक्रिया केंद्राकडून लवकर पूर्ण झाली तर तीन महिन्यात उर्वरित भूसंपादन पूर्ण करता येईल, असे सांगून बिडकिन ते पैठण मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गतीने व्हावे, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

Previous articleकिरीट सोमय्यांकडून शिंदे यांचा उल्लेख ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे माफिया मुख्यमंत्री
Next articleवाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय ; प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नाकारला