मुख्यमंत्र्यांनी ‘एकनाथ’च रहावे ‘ऐकनाथ’ होऊ नये; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांना कोपरखळी

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो हे दुर्दैव असून,राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे,’ऐकनाथ’ होऊ नये अशी कोपरखळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली.

आज पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगले असून आज नगर परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत यासंबंधीच्या विधेयकवरून माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी पहावयास मिळाली.महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो हे दुर्दैव असून, राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये अशी कोपरखळी मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली.नगरपरिषद अध्यक्ष हे जनतेतून थेट निवडले जावेत या विधेयकावर चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे मागील सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळात मांडून मंजूर केला होता.मात्र सत्ता बद्दलताच मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घेतलेला निर्णय स्वतःच बदलला हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्किल टिप्पणी मुंडेंनी केली.

आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सोबतच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो,अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत.मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.यावेळची विधानसभा अत्यंत वेगळी असून सर्व पक्षांना मत दिलेल्या जनतेला आपापले पक्ष सत्तेत आल्याचा आनंद मिळतो आहे, अशीच परिस्थिती समजा नगर परिषद निवडणुकीत झाली तर पक्ष कोणता आणि नगराध्यक्ष कोणाचा अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते,आणि त्याउपरही हा निर्णय घ्यायचाच असेल तर मग मुख्यमंत्र्यांची निवड देखील जनतेतून होऊन जाऊद्या, असे आवाहनही मुंडे यांनी सरकारला केले.मुंडे यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षांसह सत्ता पक्षातील नेते मंडळी देखील खुलून हसल्याची पाहायला मिळाली.

Previous articleविनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Next articleसत्तेत येण्यासाठी ते माशासारखे तडफडत होते; भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल