नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करून नागरी सुविधा देणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.या निर्णयामुळे बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे आलेला पूर,जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे,डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे आदी प्रकारची ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येते त्या त्या वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई प्रचलित धोरणानुसार शासनस्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येते.शासनाचे पुरग्रस्तांचे पुनर्वसन बाबतचे सदरचे धोरण निश्चित होऊन जवळपास १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी असून सध्याची आर्थिक, भौतिक व सामाजिक परिस्थिती तसेच शासनाची प्रचलित धोरणे विचारात घेता, पुरामुळे तसेच इतरही नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित तसेच या प्रकारची नैसर्गिक व आपत्तीप्रणव असलेल्या गावाचे,वाडीचे, तांड्याचे तातडीने नवीन ठिकाणी स्थलांतरीत करुन पुनर्वसन करण्याकरीता सर्वसमावेशक असे धोरण निश्चित करण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या बाधित गावाचे,वाडीचे, तांड्याचे तसेच या प्रकारची नैसर्गिक आपत्ती प्रवण असलेल्या गावाचे नवीन ठिकाणी स्थलांतरीत करुन पुनर्वसन करण्याकरीता त्या ग्रामीण भागातील पात्र लाभधारकांच्या पुनर्वसनाकरीताचे निकष, पुनर्वसित गावठाणामध्ये उपलब्ध करुन द्यावयाच्या नागरी सुविधा व त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करावी यासंदर्भात देखील निर्णय घेण्यात आला.

Previous articleकंत्राटी वैद्यकीय सहायक,आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय
Next articleपशुसंवर्धन विभागात बाह्यस्त्रोताद्वारे रिक्त पदे भरणार; लम्पीमुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई