शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात ; सुषमा अंधारेंचा दावा

मुंबई नगरी टीम

जळगाव । शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले बंडखोर आमदार अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत आहे. शिवसेनेने बंडखोरांच्या परतीचे दोर कापले नसल्याचे सांगत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.जळगाव मध्ये ‘महाप्रबोधन यात्रेत’ पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

बंडखोरी केलेले शिंदे गटात काही आमदार नाराज असून त्यातील काही जण शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत असून ते आमच्या संपर्कात असल्याचे अंधारे यांनी सांगून बंडखोरांच्या परतीचे संकेत दिले.यावेळी त्यांनी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील आरोपप्रत्यारोपवरही भाष्य केले.युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे संयमी भाषेचा वापर करत आहेत ते टीका करताना कधीही पातळी सोडणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.ईडी,सीबीआयचा सारख्या यंत्रणांचा भाजपकडून दुरुपयोग सुरू आहे. मात्र भाजपमध्ये असलेल्या भ्रष्टाचारी नेत्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे अंधारे यांनी म्हटले.राज्यात सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू असून लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही.राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या मात्र,या घोषणा हवेतच विरल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

मला सर्व धर्माबाबत आदर आहे.स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील परिषदेत हिंदुत्व सांगितले ते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगून.सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वावर भूमिका स्पष्ट केली.अपक्ष आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादावरही त्यांनी मत व्यक्त केले.रवी राणा हे उथळ व्यक्तीमत्त्वाचे असून चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात अशी टीका करीत बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आमदार असल्याचे त्यांनी म्हटले.बच्चू कडू यांच्यावर आरोप होणे हे चुकीचे असून,त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे दु:ख होणे हे अपेक्षित आहे असेही त्या म्हणाल्या.

Previous articleराज्याबाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांची महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार ;उद्योगमंत्री सामंत यांची घोषणा
Next articleपत्रकारांचा अपमान करणा-या उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी ; नाना पटोलेंची मागणी