राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आलेली गोवा राज्यातील ‘ही’ महत्वपूर्ण योजना महाराष्ट्रात राबविणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । गोवा सरकारतर्फे राबविण्यात येणारी आत्मनिर्भर स्वयंपूर्ण गोवा योजना ही अतिशय अभिनव व प्रेरणादायी स्वरुपाची योजना आहे.या योजनेसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेले काम हे नक्कीच कौतुकास्पद आहे.त्यामुळे स्वयंपूर्ण गोवा योजनेची अभिनव कल्पना भविष्यात महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल,असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

गोवा सरकारच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या स्वयंपूर्ण गोवा योजनेचा अभ्यास करण्यासाठी गोवा येथे गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्राच्यावतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. गोवा सरकारच्या नियोजन महासंचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाअंतर्गत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विशेष परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडली.आत्मनिर्भर भारत,स्वयंपूर्ण गोवा ही योजना संपूर्ण देशासाठी आदर्शवत अशी योजना आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशाच स्वरुपाच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे काम व विविध योजना महाराष्ट्रात राबविण्यात आले होत्या.या अभियानाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते असे चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आलेली ही स्वयंपूर्ण योजना आहे. अंत्योदय, ग्रामोदय व सर्वोदय या तत्वांवर आधारीत सदर योजनेचे स्वरुप आहे. एका शासकीय अधिकाऱ्यांकडे एका गावाची जबाबदारी सोपविण्यात येते. ही जबाबदारी पार पाडणा-या या अधिकाऱ्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हटले जाते असे सांगताना चव्हाण यांनी सांगितले की, खेड्या पाड्यातील गावकऱ्यांना या योजनेच्या मार्फत वैयक्तिक लाभ मिळवून देण्यात येतो. तसेच गावांच्या विकासासाठी शासकीय योजनांच्या मार्फत किंवा लोकसहभागातून आवश्यक उपक्रम अथवा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही स्वयंपूर्ण मित्राच्या मार्फत राबविण्यात येत असून सुमारे १८०० हून अधिक प्रकारची कामे या योजनेखाली राबविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिकरित्या या योजनेकडे लक्ष असून या योजनेचा सातत्याने आढावाही वेळोवेळी घेण्यात येतो असेही त्यांनी सांगितले.

Previous articleमंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंवर मुख्यमंत्र्यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी
Next articleलोकशाही नव्हे, ही तर उद्धव ठाकरे यांची पक्ष वाचविण्याची धडपड!