वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक; शरद पवार राज्यपालांवर बरसले

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज कसा वाढेल याची खबरदारी घेणे हेच मिशन राज्यपालांचे आहे का ? अशी शंका उपस्थित करून राज्यपालपदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते,त्याचे यत्किचिंतही स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रात पाठवलेली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांचा समाचार घेतला.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली.या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला.महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेला उल्लेख या सगळ्या गोष्टी असे सांगतात या पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते त्याचे यत्किचिंतही स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रात पाठवलेली आहे असेही शरद पवार म्हणाले.राज्यपाल ही एक संस्था आहे. त्या संस्थेची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून त्यावर आतापर्यंत कोण बोलले नाही मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उल्लेख पाहिल्यानंतर राज्यपालांनी आता पार मर्यादा ओलांडल्या आहेत अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर त्यांचे कौतुक करणा-या प्रतिक्रिया आल्या आहेत. पण हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.त्यामुळे राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी त्यांचा निकाल घेतला पाहिजे आणि अशाप्रकारच्या व्यक्तीकडे जबाबदारी देणे योग्य नाही असे स्पष्ट मत पवार यांनी मांडले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहे परंतु आम्ही बरीच वर्षे बेळगाव,कारवार,निपाणी यासह इतर गावे मागत आहोत.त्यामध्ये आमचे सातत्य आहे.आता कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल यावर चर्चा होऊ शकते मात्र काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही अशा शब्दात त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिर्डी दौ-यात भविष्य जाणून घेतले यावरही पवार यांनी भाष्य केले.अशा गोष्टीवर माझा विश्वास नाही त्यामुळे मी जागा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.हल्ली महाराष्ट्रात नवीन काही सुरू झाले आहे जे कधी महाराष्ट्रात झाले नव्हते.आसाममध्ये काय घडले हे सगळे देशाला माहित आहे आता पुन्हा आसामची सहल होणार आहे तसे वर्तमानपत्रात वाचले. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणे आणि आणखी कुठे सिन्नरला जाणे व कुणाला तरी हात दाखवणे या सगळ्या गोष्टी आम्हा लोकांना नवीन आहेत.हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे.विज्ञानाचा पुरस्कार करणारे राज्य हा राज्याचा लौकिक आहे त्या राज्यात या सगळ्या गोष्टी नवीन पहायला मिळत आहे. मात्र नवीन पिढी या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करणार नाही हे दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्रीही पवार यांनी व्यक्त केली.

गुजरात राज्यात निवडणूका होत आहेत मात्र आपल्या राज्यात सुट्टया देण्याचा प्रघात यापूर्वी ऐकला नाही. गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय अशी शंका येणारी स्थिती आहे असेही पवार म्हणाले.पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवरही भाष्य केले.आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय स्वच्छ व स्पष्टपणे बोलत नव्हते आज ते बोलायला लागले आहे.एकंदरीतच सत्तेचा दुरुपयोग कशापद्धतीने केला जात आहे हे त्यांच्याही लक्षात आले आहे असेही पवार म्हणाले.राज्यात आज शेतकरी अस्वस्थ झाला आहे.इतक्या संकटात पहिल्यांदाच सापडला आहे.त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची राज्यसरकारची जबाबदारी आहे मात्र तशी ठोस पावले उचलताना सरकार दिसत नाही. या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने बघायची गरज असताना सरकार बघत नाही ही दु:खद बाब आहे अशी नाराजीही पवार यांनी व्यक्त केली.

Previous articleमी राज्यपाल पदाचा आदर करतो,परंतु कोश्यारींचा नाही; उद्धव ठाकरेंचा टोला
Next articleशिंदे -फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का ?