विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील काही गावांना कर्नाटक मध्ये सामील होण्याचे आवाहन करीत जत तालुक्यातील काही गावांमध्ये शेतीसाठी पाणी सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नी तातडीची बैठक घेत जत तालुक्यातील गावांसाठी महत्वाची विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करण्याच्या सूचना दिल्या. उपसा सिंचन योजना आणि गावागावातील पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी तसेच या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सीमा भागातील या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या आरोग्य,शिक्षण,वीज तसेच पायाभूत सुविधा यासाठी संबंधित विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटक राज्यात जाण्याचा इशारा दिल्यावर या दुष्काळी भागातील काही गावांसाठी कर्नाटक सरकारने शेतीसाठी पाणी सोडले आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमा भागातील गावांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठकी आयोजित केली होती.या परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि गावा-गावांतील पाणी पुरवठा योजनांची कामे यांना गती देणे आवश्यक आहे. विस्तारीत उपसा सिंचन योजनेसाठीची सुधारित प्रशासकीय मान्यता, ते प्रत्यक्ष काम सुरु होणे यासाठी सर्वच पातळ्यांवर कार्यवाहीला गती द्या अशा सूचना दिल्या. एकीकडे तांत्रिक बाबी, आराखडे तसे अनुषंगीक बाबी पूर्ण करण्यावर भर द्यावा.विस्तारीत योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधा.पाण्यापासून वंचित या गावांना दिलासा देण्यासाठी आणि या गावांसाठीच्या पाणी योजनांसाठी उद्भव स्त्रोत असणाऱे तलावांमध्ये वेळेत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सर्व बाबींसाठी कालबद्ध पद्धतीने आणि नेमके नियोजन करा,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेनंतर आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण आणि तेथील पदभरती, शिक्षकांची पदभरती, शाळांसाठी आवश्यक निधीसाठीची तरतूद याबाबत विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार करावेत. याभागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत विविध विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विशेषतः जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगांव या तालुक्यात द्राक्ष आणि डाळींबाच्या बागांचा सिंचन हा महत्वाचा मुद्दा आहे. या बागांना दिवसा पाणी देता यावे यासाठी भारनियमनाच्या वेळांमध्ये सवलत देण्यासाठी एमईआरसी आणि विविध यंत्रणांनी विशेष बाब सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले.

Previous articleप्लास्टिकचे स्ट्रॉ, ताट कप प्लेट्स काटे चमचे यांच्या उत्पादन व वापरावरील बंदी हटवली
Next articleभाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र