उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान,महाराष्ट्र हितापेक्षा स्वतःच्या राजकारणाला महत्त्व

मुंबई नगरी टीम

मुंबई । जगातील प्रगत राष्ट्रांच्या जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून त्या निमित्ताने राज्याचा विकास आणि आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी आहे.या संदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीला केंद्र सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देऊनही ते बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच्या राजकारणाला महत्त्व देऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा अपमान केला आहे,त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत.यानिमित्ताने राज्यातील विकासाचे प्रकल्प आणि आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी आहे.जी २० परिषदेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.त्याला भाजपाखेरीज इतर अनेक प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते.परंतु निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण होते.त्यांना काही कारणाने उपस्थित राहता आले नसेल तर पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित रहायला हवे होते.पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या या दोन्ही नेत्यांनी बैठकीस गैरहजर राहून महाराष्ट्राचा अपमान केला असल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

महाराष्ट्राला या परिषदेतून खूप काही मिळणार आहे.अशा वेळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार का उपस्थित राहिले नाहीत,हे त्यांनी सांगितले पाहिजे.या बैठकीच्या ऐवजी उद्धव ठाकरे दिवसभर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आणि महाविकास आघाडीची बैठक यात गुंतलेले राहिले.या बैठका नंतरही झाल्या असत्या. महाराष्ट्राच्या हिताच्या महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर राहणे हा राज्याचा अपमान आहे. हे निषेधार्ह आहे.महाविकास आघाडी मोर्चा काढणार असल्याबद्दल विचारले असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मोर्चा कशासाठी काढणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तर शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळले नाही. त्यावेळी कधी उद्धव ठाकरे यांना निषेध करावसा वाटला नाही आणि आता कशासाठी मोर्चा काढत आहेत ? असा सवालही त्यांनी केला.

Previous articleकेवळ निषेध करून चालणार नाही,..’अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी
Next articleदेवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन….काय म्हणाले फडणवीस ?