महाविकास आघाडीचा महामोर्चा होणार म्हणजे होणारच ! अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी ठणकावले

मुंबई नगरी टीम

मुंबई । सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन करतानाच शनिवारी १७ रोजी होणारा महाविकास आघाडीचा महामोर्चा होणारच असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावले.

आज महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान, सीमा प्रश्न व महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी लोकांचा धिक्कार करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि जनताही मोठ्याप्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही परंतु स्वाभिमान दुखावला गेला आहे असेही लोकं सहभागी होतील असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.अत्यंत समंजस भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. ज्या – ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या त्या – त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. आजच्या बैठकीत मोर्चाचा आढावा घेण्यात आला. तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्यामार्गाने लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो त्याचपध्दतीने हा मोर्चा काढणार आहोत असेही अजित पवार म्हणाले.

आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विनियोजन बिलासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीबाबत काय ठरले,त्या बैठकीतून काय मार्ग निघाला याची विचारणा केली त्यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांनी शांतता ठेवावी. महाराष्ट्रातून तीन मंत्री आणि कर्नाटकचे तीन मंत्री अशी सहा लोकप्रतिनिधींची समिती राहिल आणि अधिकार्‍यांची एक समिती राहणार आहे असे सांगितले.कर्नाटकची बाजू न्यायालयात रोहतगी मांडणार आहेत हे समजल्यावर ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.आपली बाजू न्यायालयात चांगल्या पद्धतीने मांडावी अशी मागणी सीमा भागात राहणारे आणि महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे.बेळगाव, कारवार, निपाणी हे आपल्यात आले पाहिजे अशा पध्दतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवले आहे.दोन्ही राज्यांनी समंजस भूमिका घ्यावी शिवाय विरोधी पक्षांनीही घ्यावी त्यात तिन्ही पक्षाचा उल्लेख अमित शहा यांनी केला. आम्ही पहिल्यापासून राजकारण करायचं नाही अशी आमची भूमिका राहिली आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘हीच वेळ आहे जागे होण्याची’ आणि या महामोर्चात सहभागी होण्याची अशी हाक तमाम महाराष्ट्र प्रेमींना दिली. शिवाय सीमावादावर जी बैठक झाली त्या बैठकीत नवीन काय घडले असा सवाल करतानाच हा वाद ट्वीटने १५ – २० दिवस चिघळत असताना खुलासा करायला इतका वेळ का लागला आणि हा खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला.

Previous articleबोम्मईंचे ट्विट म्हणजे जखमेवर मीठ,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त होयला हो करून आलेत
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली कोळीबांधवांची मागणी