नाशिकमध्ये शुभांगी पाटील तर नागपुरात सुधाकर अडबालेंना मविआचा पाठिंबा;सत्यजित तांबेंचे निलंबन

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असून, नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे.नाशिक पदवीधर मसदार मतदारसंघातून बंडखोरी केलेले सत्यजित तांबे यांचे ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने डॅा.सुधीर तांबे यांनी उमेदवारी जाहीर केली होती.मात्र त्यांना उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी वरून महाविकास आघाडीत गोंधळाचे वातावरण होते.तसेच नागपूरमध्ये उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याने यावर निर्णय घेण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रीत चर्चा करून नाशिक व नागपूर मतदार संघाबाबत निर्णय घेतलेला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाशी बेईमानी करत अर्ज दाखल केला नाही त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना मविआने पाठिंबा जाहीर केला आहे. विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागपूरमधून सुधाकर अडबाले,अमरावतीमधून धीरज लींगाडे,औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील व कोकणमधून बाळाराम पाटील असतील. विधान परिषदेच्या या पाचही जागांवर महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्ते एकदिलाने काम करून या पाचही जागा विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा पाठिंबाच आहे म्हणून तर काँग्रेसशासित राजस्थान, छत्तिसगड व हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू केली आहे परंतु भाजपाशिसत राज्यात ही योजना लागू केली जात नाही. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या मुद्द्यांवरून भाजपाविरोधात तीव्र संताप आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्देही महत्वाचे आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. भाजपा हा दुसऱ्यांची घरे फोडणारा पक्ष असून पाठीमागून वार करणाऱ्या भाजपाला जनताच धडा शिकवेल असेही पटोले म्हणाले.या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते व विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.

Previous articleमोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल ; काँग्रेसचा घणाघाती आरोप
Next articleविकास कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊ नये अशी काहींची इच्छा होती