वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा;भास्कर जाधवांची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई । उद्धव ठाकरे यांना यापुढे घरकोंबडा म्हणाव लागेल.त्यांनी राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे,अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख ( उबाठा ) उद्धव ठाकरे यांच्यावर केली.या टीकेचा समाचार घेताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा,असा टोला लगावला आहे.या टीकेवरून आक्रमक झालेल्या भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख ( उबाठा ) उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत उद्धव ठाकरे यांना यापुढे घरकोंबडा म्हणाव लागेल.त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे,अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा,असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला.जाधव यांच्या या टीकेवर नंतर भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला.बावनकुळे यांच्यावर वर्णद्वेषी भाषेत टीका करून भास्कर जाधव यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे.या बद्दल जाधव यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणीही वाघ यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी-२० परिषदेची यशस्वी सांगता झाली.जगभरात भारताची मान उंचावली आहे.मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा झाली. असे असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी भाजपाच्या नेत्यांचा खालच्या स्तरावर जाऊन अवमान करण्याची स्पर्धाच लावली आहे. स्वत:च्या नाकर्तेपणामुळे आज उद्धव ठाकरे यांची अवस्था करमणूक करणाऱ्या विदुषकासारखी झाली आहे. विदुषक निदान निखळ मनोरंजन तरी करतात पण हे कामदेखील ठाकरे आणि त्यांच्या टोळीला जमत नाही अशी कोपरखळी त्यांनी मारली.ठाकरे यांना आपण केवळ करमणुकीपुरते उरलो आहेत याची जाणीव होईल असेही त्या म्हणाल्या.ठाकरे यांच्या टोळीतील सर्वज्ञानी संजय राऊत, शिवीगाळ करणारे भास्कर जाधव यांनी वेळीच तोंडाला आवर घालावा अन्यथा परिणामांस सामोरे जावे लागेल. आमचे नेते, कार्यकर्ते संस्कारी, संयमी आहेत मात्र यापुढे संयमाचा बांध फुटेल आणि त्याच भाषेत उत्तर मिळेल, असेही वाघ यांनी सांगितले.

Previous articleराज्य सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या ! रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा
Next article१५ टक्के सेवा शुल्काच्या नावाखालचे कमिशन भाजपच्या लोकांच्या खिशात जाणार