एकरी ३ क्विंटल कापूस निघतोय…कसं जगायचं…शेतकऱ्यांचा सवाल!
तर सेलूच्या विद्यार्थींनींनी शैक्षणिक असुविधांचा वाचला पाढा
वर्धा : मागच्या आणि यावर्षी ७५ टक्के कापसाच्या उत्पन्नामध्ये फरक पडला आहे .एकरी १५ ते १८ क्विंटल कापूस निघत होता परंतु आता फक्त एकरी तीन क्विंटलही कापूस निघत नाही. अजुन कापूस शेतकऱ्यांनी बाजारात घातलेला नाही इतकी वाईट परिस्थिती असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी हल्लाबोल पदयात्रेतील सहभागी खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडली.
हल्लाबोल पदयात्रा गावागावातून जात असताना कापूस उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील कापूस आणून दाखवत आहेत. कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाला असून हातातोंडाशी आलेल्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ते शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत.
हल्लाबोल पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांचा मोठा सहभाग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकरी स्वत:हून हल्लाबोल पदयात्रेमध्ये सहभागी होत आहे. आठव्या दिवसाच्या पदयात्रेमध्ये केळझर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
तर सेलू येथील यशवंत महाविदयालयाच्या विदयार्थींनीनी आपल्या शैक्षणिक असुविधा खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडल्या. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे आई-वडील त्रस्त आहेत.आमचा निरोप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा अशी विनंती या विदयार्थींनींनी केली.