रिफायनरी विरोधी आंदोलनामुळे सेनेचा दुटप्पीपणा उघड
सुनिल तटकरे यांची टिका
मुंबई : कोकणात होवू घातलेल्या रिफायनरी विरोधात स्थानिकांनी आज मुंबईत आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेच्या आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेकडे केंद्रात मंत्रीपद, राज्यातील उद्योग आणि पर्यावरण मंत्रीपद आहे. कोकणात रिफायनरी प्रकल्प आणण्यात शिवसेनेचाच पुढाकार आहे. तरीही प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या आंदोलनात शिवसेनेने सामील होऊन गावकऱ्यांना फसवले असल्याने यापेक्षा मोठी नौटंकी काय असू शकते असा सवाल करीत रिफायनरी विरोधी आंदोलनामुळे सेनेचा दुटप्पीपणा उघड झाल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली.
राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत असताना कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ दिला नव्हता. शिवसेनेकडून अशी एक भूमिका येण्याची अपेक्षा नाही.गेल्या तीन वर्षांत शेतकरी प्रश्नांवर सरकार किती गंभीर आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाना पटोले यांचा राजीनामा आहे. भाजपच्या अकार्यक्षम आणि उदासीन धोरणांमुळे पटोले यांनी राजीनामा दिला. भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनात असंतोष होता. मागच्या काही काळातील त्यांच्या वक्तव्यावरुन ते दिसून येत होते. पटोले भाजपचे असून त्यांनी राजीनामा दिला मात्र सत्तेतून बाहेर पडू असे वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेचे राजीनामे मात्र खिशातून काही बाहेर येत नाहीत, अशी टीका तटकरे यांनी शिवसेनेवर केली. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे आता रिक्त झालेल्या जागेबाबत काय करायचे ते काँग्रेसबरोबर चर्चा करून ठरवू, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.