मुंबईतील मुसळधार पावसातील अपादग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत करा !
टोल नाके बंद करावेत
आमदार प्रकाश सुर्वे यांची मागणी
नागपूर : गेल्या आठवड्यापासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काल रात्री दहिसर (पूर्व) एन.जी.पार्क येथील तीन घरे जमीनदोस्त झाली. मुंबईसह ठाणे,पालघर,रायगड येथे झालेल्या मुसळधार पावसात जीवित व वित्त हानी होऊन अनेक घरांचे,शेतीचे तसेच गाड्यांचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे मुसळधार पावसातील अपादग्रस्त नागरिकांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार आमदार प्रकाश सुर्वे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे केली.
गेल्यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसातील अपादग्रस्त नागरिकांना शासनाने ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती.त्याप्रमाणे शासनाने यंदा १० हजार रुपयांची तातडीने रोख आर्थिक मदत करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.या मुसळधार पावसात राज्यातील रस्त्यांची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे.त्यामुळे विशेषकरून टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होई पर्यंत वाहन चालकांकडून टोल आकारणी करू नये,जेणे करून वाहतूक कोंडी दूर होऊन क।वाहन चालकांना आर्थिक दिलासा मिळेल अशी मागणी देखिल आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आ. सुर्वे यांनी दिलीे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी येत्या १२ जुलै पर्यंत मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना शासनाने सुट्टी जाहिर करावी अशी मागणी देखिल आमदार सुर्वे व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे यांनी मुख्यमंत्री व राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.