खोतकरांचे काही ठरेना,दानवेंना टेन्शन
मुंबई नगरी टीम
जालना : जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निवडणूक लढवणार आहेत.पण शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी त्यांना आव्हान देणे सुरूच ठेवले असल्याने दानवे टेन्शनमध्ये आहेत.खोतकरांनी अजूनही येथून निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यांनी सांगितले की,आजपर्यंतचे सर्व सर्व्हे हे माझ्या बाजूने आहेत.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, अशी आशा आहे.
अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्यातील राजकीय वैर युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत दानवेंचे नाव आहे. पण खोतकरांनी माघार घेतलेली नाही. ठाकरेंनी आदेश दिल्यास आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचे खोतकर सांगतात.उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल.ते माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहचलेला नाही, अशी माहिती अर्जुन खोतकरांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी दानवे यांच्या विरोधात खोतकरांनी निवडणूक लढवावी,या मागणीसाठी शिवसैनिकांनी खोतकरांच्या घरी ठिय्या आंदोलन केले होते.शिवसैनिकांचा दानवे यांच्यावर कमालीचा राग आहे. दानवे यांनी अनेक शिवसैनिकांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवले,असा त्यांचा आरोप आहे.