महाराष्ट्राची सायबर आर्मी तयार करणार

महाराष्ट्राची सायबर आर्मी तयार करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : येणारा काळ आणि काळातील गुन्ह्यांची आव्हाने लक्षात घेऊन मुंबई पोलिसांसाठी वांद्रे पश्चिम येथे उभे राहत असलेले अद्ययावत सायबर पोलीस स्टेशन हे देशातील महाराष्ट्राचे पहिले पाउल ठरेल असेच आहे, अशा शब्दात या उपक्रमाचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची स्वतंत्र सायबर आर्मी उभी करणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली.

वांद्रे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर सायबर क्राईम पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे पोलिस स्टेशन या भूखंडावर उभे राहावे म्हणून मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा केला त्याला अखेर यश आले. अशा या महत्त्वाच्या कामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक विपिन बिहारी आदी उपस्थित होते

भूमिपूजनानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज हा मुंबई पोलिसांच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारा क्षण आहे. कारण आता गुन्हे रस्त्यावर न घडता व्हाईट कॉलर गुन्हे जास्त घडत आहेत. एकीकडे डिजिटलायझेशन वेगाने होते आहे त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते आहे त्यादृष्टीने भारत आणि महाराष्ट्र सरकार हे गुन्हे रोखण्यासाठी व घडलेला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काम करते आहे. याचा एक भाग म्हणून वांद्रे येथे उभे राहणारे सायबर पोलीस स्टेशन ते मुंबई पोलिसांचे देशातील एक पहिले आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल असा हा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच मुंबई पोलीस दलातील एक हजार अधिकाऱ्यांना विशेष ट्रेनिंग देऊन महाराष्ट्राची एक स्वतंत्र सायबर आर्मी उभी केली जाणार असल्याचेही त्यांनी घोषित केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हे सायबर पोलीस स्टेशन वांद्रे येथे व्हावे म्हणून आणि हा मोक्याच्या जागेवरील भूखंड या कामी वापरला जावा यासाठी आमदार आशिष शेलार यांनी गेली चार वर्षे आपल्याकडे सातत्‍याने पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.एकुण दहा मजली ही इमारत उभी राहणार असून त्‍याच्‍या पहिल्‍या सहा मजल्‍यावर सायबर पोलिस स्‍टेशन, लॅब, ट्रेनिंग स्‍टेंटर उभारण्‍यात येणार आहे. तर उर्वरीत चार मजल्‍यावर अधिका-यांसाठी घरे बांधण्‍यात येणार आहेत.

Previous articleविखे पाटील  जयदत्त क्षीरसागर अविनाश महातेकरांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार
Next articleज्येष्ठांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील