मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश देत या संदर्भातील निकाल बुधवारी दिला आहे. यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसल्या. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास जसा सीबीआयकडून सुरू आहे. तशी परिणती सुशांत प्रकरणाच्या तपासात दिसू नये,अशी आशा पवारांनी व्यक्त केली आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची तपास प्रक्रिया सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. मला खात्री आहे की, महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा सन्मान करेल आणि चौकशी प्रक्रियेत पूर्णपणे सहकार्य करेल”, असे ट्वीट पवारांनी केले आहे. तर आपल्या दुसऱ्या ट्वीट मध्ये पवारांनी सीबीआय तपासाबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “मला आशा आहे की डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी सीबीआय मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तापसकार्याची परिणती होऊ नये”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, न्यायालयाने सुशांत प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. त्या क्षणी यावर पवारांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पंरतु आज त्यांनी ट्विटरद्वारे आपले मत मांडले. विशेष म्हणजे आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूला ७ वर्षे पूर्ण झाली. आजच्याच दिवशी दाभोळकर यांची दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. परंतु ७ वर्ष होऊनही अद्याप दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचा छडा लागला नाही. बरोबर या मुद्दयावर बोट ठेवत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना याची आठवण करून देत टोल लगावला आहे.