मुंबई नगरी टीम
पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही. अशातच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मराठा समाजातील काही नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र ओबीसी आरक्षणावर गदा येत असेल तर त्यासाठी लढावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त छगन भुजबळ पुण्यात आले होते.यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका आहे. आमचा तसा प्रयत्न सुद्धा आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. मात्र मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यात ५४ टक्के ओबीसी समाज असून त्यांचे आरक्षण जैसे थे राहिले पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नव्हता.त्यांना त्यांचे आरक्षण मिळाले पाहिजे,पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या आरक्षणाच्या दुसऱ्या कायद्याला मी पाठिंबा दिला होता.शिवाय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जाणे हे काही नवीन नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले. काही लोक मराठा समाजाला ओबीसीतून ५ टक्के आरक्षण द्या,अशी मागणी करत आहेत.मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करा अशा अनेक मागण्या समोर येत आहेत.त्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो,तसे वातावरण असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले.