मुंबई नगरी टीम
मुंबई । वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकारने केला होता.मात्र आज पत्रकार परिषद घेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या आरोपातील हवा काढून घेत यासंदर्भातील पुरावे सादर केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसमोर माझ्यासोबत खुली चर्चा करावी, असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.
Today we exposed the unconstitutional govt’s lie that semiconductor project wasn’t coming to our State.
Here’s a copy of the letter from @midc_india to the project proponent seeking time for MoU signing.
If it had gone away, then why this letter?
Will the CM debate with me? https://t.co/4SxtXHdrbQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 29, 2022
युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचा दावा करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा पुरावे सादर करत खोटारडेपणाचा बुरखा फाडला.आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात खळबळजनक दावा केला.पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या अध्यक्षांना यांना लिहिलेले पत्र सादर केले. या पत्रामध्ये वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात स्थापन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यासाठी वेदांताचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांना बैठकीला येण्यासंदर्भात विनंती केल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे इंग्रजीतील पत्र आदित्य ठाकरेंनी यावेळी पत्रकार परिषदेत वाचून दाखवले.
आदित्य ठाकरे यांनी पत्रासंदर्भात बोलताना सांगितलं की, ५ सप्टेंबर २०२२ चे पत्र असून, हे तत्कालीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लिहिले आहे. हे वेदांता फॉक्सकॉनचे चेअरमन अनिल अगरवाल यांना पाठवले होते.या पत्राचा विषय राज्य सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉनमध्ये सामंजस्य करार करण्यासंदर्भातला होता.तिथपर्यंत एखादा व्यवहार येतो,त्याचा अर्थ सगळे ठरले असा असतो. फक्त मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी असते.पण हे सरकार खोटे सरकार आहे.याआधीही या पत्राचा उल्लेख मी केला होता. पण माझ्या हातात ते पत्र नव्हते. मला हे खोके सरकारमध्ये आमचे काही नाईलाजाने बसलेल्या लोकांनी सांगितले होते की अमुक सामंजस्य कराराचे पत्र गेले होते, असे त्यांनी सांगितले. या पत्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या एका बैठकीचाही पत्रात उल्लेख असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. २६ जुलैला या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली होती. पण २९ ऑगस्टला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतही झालेली बैठक नेमकी कशासाठी होती ? वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प या राज्यात ठेवण्यासाठी होती की दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी होती ? या बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती होते का ?, असा सवाल त्यांनी करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर सवाल उपस्थित केला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर ५ सप्टेंबरला सामंजस्य करारासंदर्भात हे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यावर अधिकृत उत्तर न देता थेट ट्विटरवर गुजरातला प्रकल्प नेत असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात येते. याचा नेमका काय अर्थ आहे ? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. शिंदे सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे की आमच्यामुळे राज्यात प्रकल्प येत नाहीत.उद्योगमंत्री त्या क्षेत्रात लक्ष घालतच नाहीत हे कळतंय. राजकीय अस्थिरता असल्याने कुणाचाही सरकारवर विश्वास नाही,आम्हाला न्याय मिळाला की हे सरकार कोसळेल असे भाकित करून मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर माझ्यासोबत खुली चर्चा करावी, असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे. तसेच, कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जिल्हे आणि गावे तोडून कर्नाटकला देणार का ? असा संतप्त सवाल त्यांनी राज्य सरकारला केला.