दोन वर्षात ३२०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार : ऊर्जामंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात ३२०० मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील अशी माहीती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  आज  मंत्रालयत झालेल्या एका बैठकीत दिली. या बैठकीत महावितरणच्या १६ झोन मधील प्रत्येक मुख्य अभियंताकडून २०० मेगावॅट सोलर प्रकल्प उभारण्याबाबत निर्देश देण्यात आले.

राज्यातील सर्व नळयोजना, उपसासिंचन योजना (खाजगी व शासकीय) तसेच ग्रामपंचायत मधील सर्व शासकीय इमारती (शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, आरोग्य केंद्रे) सौर ऊर्जेवर आणाव्यात या बाबत ऊर्जामंत्री यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा संवर्धन धोरणा अंतर्गत या योजना राबवण्यात याव्या तसेच या योजनेकरीता ५०० कोटीचे बजेट तयार करून मंत्रीमंडळा समोर सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऊर्जासंवर्धन धोरणा अंतर्गत पहिल्या टप्प्यात महावितरण कडून या योजना राबविण्यात येतील.

या बैठकीत एचव्हीडीएस, इन्फ्रा – २, दिनदयाल उपाध्याय व आय‍पीडीएस योजनेबाबतही आढावा घेण्यात आला. मार्च २०१९ पर्यंत इन्फ्रा २, दिनदयाल उपाध्याय तसेच आयपीडीएस योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री यांनी महावितरणला दिले. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, औरंगाबाद, चंद्रपूर, ठाणे व नांदेड विभागात आयपीडीएसची कामे महानगर पालिकेद्वारे रस्ता पुर्नस्थापना दर मान्य न केल्यामुळे  पूर्ण झाली नाहीत ती पूर्ण कराव्यात तसेच एचव्हीडीएस योजनेत ज्या भागात विद्युत वाहक यंत्रणा पोहचणे शक्य नाही त्या भागात सोलार कृषी पंप देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.राज्यात ७५० मेगावॅट सोलार प्रकल्प महाजनकोद्वारे राबवण्यात येणार आहेत. यापुढे सौर ऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरण कडून तर महाजनको कडून मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

Previous articleभाजप पदाधिकारीच गुंड आणि दहशतवाद्यांची कामे करू लागले : पाटील
Next articleशिवस्मारकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही : मुंडे