सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन आटोपते घेतले
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारत पाकिस्तान सीमेवरील तणावच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षेच्या कारणास्तव अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन आज आटोपते घेतले.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करून याची माहिती दिली. हे अधिवेशन सुरक्षेच्या कारणास्तव संपुष्टात येत असले तरी कोणीही काळजी करण्याची करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून सुरू होणार आहे.
भारत पाकिस्तान या दोन देशांच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने या ठिकाणी सर्वच महत्वाची कार्यालये आहेतच त्यामध्ये सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानभवन आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.सध्याच्या परिस्थितीत मुंबईत सुरक्षेची गरज असून, अधिवेशनाच्या कर्तव्यावर असणारा सुमारे ५ हजार पोलीसांचा ताफा उपलब्ध झाल्यास पोलीसांवर असणारा ताण कमी होवू शकतो. या पार्श्वभूमीवर काल पोलीस अधिका-यांनी मुंख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सर्व पक्षाचे गट नेते यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत कालच बैठक घेतली होती.
आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात बैठक घेतली या बैठकीला विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गट नेते उपस्थित होते. या बैठकीत आजच अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेण्याच्या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करीत अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपुष्टात येत असल्याची घोषणा केली. राज्यात अतीदक्षतेचा इशारा देण्याच आला आहे. मोठया प्रमाणावर अनेक माहिती प्राप्त होत असल्याने अधिकारी आणि पोलिस बलाचा उपयोग अन्यत्र करावा लागणार आहे. सध्या सुरू असणा-या अधिवेशनासाठी सुमारे ५ हजार पोलिसांचे बळ वापरले जात आहे. त्यामुळे सुरक्षेवरचा ताण लक्षात घेवून अधिवेशन स्थगित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांसह सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी याला पाठिंबा दर्शविला. आता पुढील पावसाळी अधिवेशन १७ जून पासून सुरू होणार आहे.