राज ठाकरे सोनिया गांधी यांच्या भेटीत काय झाली चर्चा

राज ठाकरे सोनिया गांधी यांच्या भेटीत काय झाली चर्चा

मुंबई नगरी टीम

मुंबई : दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज  काँग्रेसच्या  माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. येत्या ऑक्टोंबर महिन्यात होणा-या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीत महाआघाडीत मनसेला स्थान देण्याबाबत काँग्रेसचा असणारा विरोध मावळण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.

अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला महाआघाडीत घेण्यास प्रखर विरोध होता.तर मनसेच्या प्रवेशासाठी राष्ट्रवादीचे नेते आशावादी होते. लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभे न करता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडत भाजपच्या विरोधात राज्यभर सभा घेतल्या होत्या. पण राज ठाकरे यांच्या सभांचा तसा फारसा परिणाम भाजपवर झाला नाही. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतली.

या भेटीमुळे  आगामी विधानसभा निवडणुकीत नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी  काँग्रेसने विरोध केला होता. आज राज ठाकरे यांनी थेट सोनिया गांधींची भेट घेवून आपली भूमिका मांडल्याचे समजते. आजच्या भेटीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय समिकरणे मांडून मनसे विषयी असलेला गैरसमज दूर केल्याचे बोलले जाते. आता थेट हायकमांडलाच राज ठाकरे यांनी साकडे घातल्याने राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे.तर मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली असल्याची चर्चा आहे.

Previous articleशासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ
Next articleदुष्काळी भागातील शेतक-यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी