खुशखबर : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक वर्षाच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करा
मुंबई नगरी टीम
मुंबई : राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तीकडे नामनिर्देशनपत्र सादर करताना जात वैधता प्रमाणपत्र नसले तरीही त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाग घेता येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार ३० जून २०२० पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
जात पडताळणी समित्यांकडील कामाचा भार प्रचंड प्रमाणात असल्याने सदस्यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त होत नाही. या परिस्थितीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्ती जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून तसेच निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १०-१ क, ३०-१ क व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमच्या कलम १२ क, ४२ (६-क), ६७ (७-क) मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यपाल महोदयांना अध्यादेश प्रख्यापित करण्याबाबत शिफारस करण्यात येणार आहे.