मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी सुरू करण्याची घनंजय मुंडेंची मागणी
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी गरीब रुग्णांना दिलासा देण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहित विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणाले आहेत की ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्याने गरीब रुग्णांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रपती राजवटीत शासनाचा कारभार सुरू ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर दिली आहे. आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करून हजारो रुग्णांना दिलासा द्यावा’ अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.राज्यपाल या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.