मुंबई नगरी टीम
मुंबई । विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले.गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले.भर पावसात विश्रांती न घेता,रेनकोट घालून स्वत: बचाव कार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक झाले.
#रायगड जिल्ह्यातील #खालापूर जवळील #इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मी स्थानिक नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन #एनडीआरएफ पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी… pic.twitter.com/4AUCXf8gIU
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023
विशेष म्हणजे आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांवर कामकाजाची जबाबदारी टाकली आणि स्वत: बचाव कार्यात झोकून दिले. एरवी पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅण्ट परिधान केलेले मुख्यमंत्री आज एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसले. मुख्यमंत्र्यांनी भर पावसात इर्शाळवाडीकडे चढाईला सुरूवात केली. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले.मी मुख्यमंत्री असलो तरी स्वत:ला सामान्य कार्यकर्ताच समजतो, असे नेहमी मुख्यमंत्री भाषणांमधून सांगत असतात. त्याचा प्रत्यय आज सर्वांना आला. अपघात असो..आपत्ती येवो.वैद्यकीय मदत असो सामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामान्यांसाठी असणारी तळमळ आज पुन्हा एकदा दिसून आली.मुख्यमंत्री शिंदे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानाहून घटनास्थळाकडे निघाले. ते साडेसातच्या सुमारास तेथे पोहोचले. तेव्हापासून त्यांनी अथकपणे मदत आणि बचाव कार्यासाठी निर्देश दिले.
#रायगड जिल्ह्यातील #खालापूर जवळील #इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन येथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.
या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून गावातील काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत… pic.twitter.com/faoC8wAK7R
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023
प्रतिकुल परिस्थितीमुळे पुरेशी यंत्रणा डोंगरावर मदतकार्यासाठी जाऊ शकत नव्हती हे पाहून सकाळी साडेसात पासून प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या मुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्ता अस्वस्थ होता. डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष मदत केली पाहिजे नागरिकांना बाहेर काढले पाहिजे असे ते सोबतच्या मंत्र्यांना देखील सांगत होते. इर्शाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेस कॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सुचना देऊन तेथून निघाले नाही. त्यांनी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकच्या सुमारास भर पावसात मुख्यमंत्री इर्शालगडावर पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीडतासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले.मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाच सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर सर्व यंत्रणांनी आणखी वेग घेतला. प्रतिकुल हवामान, अवघड चढण यावर मात करीत मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांशी चर्चा करीत मजल दरमजल करीत चढण चढत होते.केंद्रिय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसारीतल सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक संस्था यांच्याशी ते सतत बोलत होते आणि त्यांच्याकडून बचावासाठी आणखी काय काय करता येईल ते पहात होते. मदत कार्याला वेग येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.एकीकडे प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात सहभागी होतांना मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील पिडितांचे अश्रु पुसण्याचे काम केले, त्यांना दिलासा दिला. जिल्हा प्रशासनाला पिडितांच्या पुनर्वसनासाठी व्यवस्था, निवासाची सोय, भोजन याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.