पुणे जिल्हयातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

पुणे जिल्हयातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

मुंबई नगरी टीम

पुणे : जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आलेली विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. तसेच जिल्हयातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हयातील विविध विकास कामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेतला.यावेळी पुणे महानगर विकास प्राधिकरणा अंतर्गत असलेल्या शिवाजीनगर-हडपसर महामेट्रो तसेच पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेताना कामासाठी लागणारा कालावधी, कामाची सद्यस्थिती, भूसंपादनाबाबतच्या अडचणी आदी विषयाबाबत माहिती घेत मेट्रोच्या कामाला गती देण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत पवार यांनी पुणे शहरात विकासकामे करताना दीर्घकालीन विचार करणे आवश्यक असून भौगोलिक विचार करून विकासकामाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. पुणे शहाराच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधीची गरज लक्षात घेत अर्थसंकल्पात तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय नदी संवर्धन योजने अंतर्गत मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. भामा आसखेड प्रकल्पाच्या कामासदंर्भात  पवार यांनी सविस्तर माहिती घेत याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही सबंधित अधिका-यांना केल्या. पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील स्थितीही पवार यांनी जाणून घेतली.
श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ मार्ग विकासकार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली. यामध्ये देहू,आळंदी भूसंपादन, पंढरपूर येथील वाळवंट सुधारणा कार्यक्रम, पालखी मुक्काम व रिंगण विकास, पालखी तळ भूसंपादन, आदि विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्य शासनाकडून केलेली कामे समाधानकारक असून नागरी सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून या सुविधांची जपवणूक करणे आवश्यक असल्याचे सांगून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी तसेच आवश्यक सोयी सुविधेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

Previous articleमाळीणच्या धर्तीवर तिवरे धरणबाधितांचे पुनर्वसन : उदय सामंत
Next articleमेगाभरतीवरून चंद्रकांत पाटलांचे घूमजाव