मुंबई नगरी टीम
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिमंत असेल तर निवडणुका घेण्याचे आव्हान महाविकास आघाडीला दिले होते.त्यांच्या या वक्तव्याचा समाचार कॅांग्रेसचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग,मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी घेतला. आम्ही फडणवीस यांचे आव्हान स्वीकारायला तयार आहोत.पण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात पुन्हा निवडणुका लावून मोदी सरकारने जनादेशाला सामोरे जावे असे प्रतीआव्हान शेख यांनी दिले आहे.
नवी मुंबईत झालेल्या भाजपाच्या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही ,ते स्वत : च पडेल हिमंत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरं जावून दाखवा असे आव्हान दिले होते.भाजपाच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे.भाजपा एक एक करुन राज्यांमधली सत्ता गमावत चालली आहे.आणि म्हणून ब्रिटीशांच्या फोडा आणि राज्य करा या नितीचा अवलंब करुन मोदी सरकार आपली सत्ता अबाधित ठेऊ पाहत आहे.मुळ मुद्यांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी सिएए, एनआरसीसारखे कायदे आणले जात आहेत असेही शेख म्हणाले.