ज्या लोकांमध्ये जन्मलो, वाढलो,त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची सूत्रे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून आता सामाजिक न्याय विभागाला सोपवण्यात आली आहेत. पर्यायाने ऊसतोड कामगारांचे कल्याण साधण्याचे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आता त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

राज्यात ८ लाखाहून अधिक ऊसतोड कामगार आहेत, त्यातील बहुतांश हे बीड जिल्ह्यातील आहेत. असंघटित व असुरक्षित असलेल्या या वर्गाला सामाजिक प्रवाहासह सुरक्षा, आर्थिक उन्नती साधण्याचे मोठे आव्हान असून, अत्यंत आनंदाने आपण ते स्वीकारत आहोत. मी स्वतः ऊसतोड कुटुंबातील आहे. ज्या लोकांमध्ये वाढलो, वावरलो त्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची ही खरी संधी असल्याचे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

फडणवीस सरकारच्या वेळी हे महामंडळ गठीत करण्यात आले होते,विरोधी पक्षात असतानाही मुंडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. परंतु त्यावेळी हे महामंडळ केवळ घोषणेपूरतेच मर्यादित राहीले. परळी येथे या महामंडळाचे नाव दिलेले व कायम बंद राहिलेले कार्यालय तर राज्यात चर्चेचा विषय ठरले होते. या महामंडळाला आता मूर्त स्वरूप देऊन ऊसतोड कामगारांच्या साठी कल्याणकारी योजना राबवू, सुरक्षा व आर्थिक उन्नती साधत ऊसतोड कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असेही यावेळी बोलताना मुंडे म्हणाले. स्व. गोपीनाथराव मुंडे हे ऊसतोड कामगारांचे नेते होते, त्यांच्याच मूळ मागणीनुसार हे महामंडळ त्यांच्या नावेच सुरू करण्यात आले होते. ऊसतोड कामगारांना सुरक्षा, आर्थिक उन्नती, मुलाचे शिक्षण यांसह विविध कल्याणकारी योजना तयार करून त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान उद्योग, कामगार व ऊर्जा विभागाकडून या महामंडळाची जबाबदारी आपल्या विभागाकडे सोपविण्यात यावी अशी विनंती धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली होती; त्यानुसार काल शासन निर्णय निर्गमित करून स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेले धनंजय मुंडे हे या उपेक्षित व असुरक्षित वर्गाला नक्कीच न्याय मिळवून देतील अशा अपेक्षा ऊसतोड कामगार नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Previous articleतूर उत्पादक शेतक-यांना सरकार दिलासा देणार !
Next articleउद्धव ठाकरेंना गुंठेवारी नाही तर केवळ मुंबईतील जमीनीच्या किमती कळतात : चंद्रकांत पाटील