मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयामुळे शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवप्रताप दिनी प्रतापगडावरील अफझलखान कबरीवरील अतिक्रमण हटविल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडे आहे.या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.असे छत्रपती संभाजीराजे यांनी एक पत्रक काढून म्हटले आहे.

शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत अफझलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले.राज्य सरकारच्या या धाडसी निर्णयाचे छत्रपती संभाजीराजे यांनी स्वागत केले आहे.त्याचबरोबर इतर किल्ल्यांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी सरकारने धडक मोहीम उघडावी असे सांगत,या मोहिमेस पूर्ण सहकार्य करणार असल्याचीही ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझलखानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारला.मरणानंतर वैर संपते,या भावनेने महाराजांनी त्याच ठिकाणी विधीवत दफन करून खानाची कबर बांधली,असे इतिहासकारांचे मत आहे.परंतु अलीकडच्या काळात काही लोकांनी अफझलखानाचे उदात्तीकरण करत या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला होता.न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊन सुध्दा हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडे आहे असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगली सुरूवात झालेली आहे.केवळ प्रतापगडच नव्हे तर शिवरायांच्या अनेक किल्ल्यांना या अतिक्रमणाच्या व्याधीने ग्रासलेले आहे.विशाळगड हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे.मात्र लोहगड, मलंगगड, चंदन वंदन सारख्या अनेक किल्ल्यांवर देखील अलीकडच्या काळात ही व्याधी जडत चाललेली आहे. यंत्रणांच्या हेतुपुरस्पर डोळेझाकीमुळे या गडकोटांच्या गौरवशाली इतिहासावर आघात घातला जातो आहे. काही महिन्यांपूर्वी रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार शिवभक्तांच्या पाठिंब्याने हाणून पाडला होता.आम्हाला रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराची साधी डागडुजी करायची असली तरी परवानग्या आणायला दिल्लीत पन्नास बैठका बैठका घ्याव्या लागतात आणि इतके करूनही परवानगी मिळत तर नाहीच.मात्र इतरांना हे नियम लागू होत नाहीत का ? ही मुजोरी मोडून काढण्याच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकले आहे, याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन! या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत अशी मागणी करून या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल,अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.

Previous article” या राज्यात चाललंय काय ” ? चूक करतो त्याला माफी आणि आंदोलन करतो त्याला शिक्षा
Next articleउद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा,एकदा कोणी शरद पवारांच्या तावडीत सापडला की,सुटत नाही