राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६३५ वर पोहचली

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोना बाधित १४५ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६३५  झाली आहे. आतापर्यंत ५२ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजच्या राज्यस्तरीय अहवालात खाजगी प्रयोगशाळांमधील अहवालांचा समावेश करण्यात आलेला आहे.

आज राज्यात ६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आज झालेल्या मृत्यूपैकी १ रुग्ण मुंब्रा ठाणे येथील तर १ रुग्ण अमरावती येथील आहे. उर्वरित ४ रुग्ण मुंबई येथील आहेत. या ६ रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत १) मुंब्रा येथील इलेक्ट्रिशियन असणा-या ५७ वर्षीय पुरुषाचा आज सकाळी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते.  २) मुंबईच्या नायर रुग्णालयात काल संध्याकाळी एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला फुप्फुसाचा तसेच हृदयविकार होता. मधुमेह असणा-या या महिलेला हायपोथायरॉडिझम हा आजारही होता. ३) मुंबईच्या के ई एम रुग्णालयात निवृत्त बेस्ट वाहनचालक असणा-या ६७ वर्षीय पुरुषाचा  काल सकाळी मृत्यू झाला. त्यांना १० वर्षापासून मधुमेह होता. ४) मुंबईच्या के ई एम रुग्णालयात ५३ वर्षीय पुरुषाचा  काल पहाटे मृत्यू झाला. निवृत्त मिल कामगार असणा-या या रुग्णाने परदेशात प्रवास केलेला नव्हता.५) मुंबईच्या के ई एम रुग्णालयात ७० वर्षीय पुरुषाचा ३ एप्रिल रोजी संध्याकाळी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. ६) अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात एका ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. व्यवसायाने मेकॅनिक असणा-या या व्यक्तीला अस्थमाचा त्रास होता. त्याने कोठेही प्रवास केल्याचा इतिहास नाही. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२ झाली आहे.

राज्यात आज एकूण ७०८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ हजार ५०३ नमुन्यांपैकी १३ हजार ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ हजार ७१३  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत असून मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी ५२३ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४२३ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९६ नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.  राज्यात या प्रकारे एकूण २८४९ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-

मुंबई                                ३७७

पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ८२

सांगली                              २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा  ७७

नागपूर, अहमदनगर प्रत्येकी  १७

यवतमाळ                           ४

लातूर                                ८

बुलढाणा                         ५

सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद प्रत्येकी   ३

कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव  प्रत्येकी २

सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशीम, अमरावती, हिंगोली प्रत्येकी                     १

इतर राज्य – गुजरात    १

एक रुग्णाच्या पत्त्याची खातरजमा करण्यात येत आहे.

एकूण ६३५ त्यापैकी ५२ जणांना घरी सोडले तर ३२ जणांचा मृत्यू

Previous articleअबब..लॉकडाऊनच्या काळात २ कोटी ८२ लाखाची दारू  जप्त
Next articleआता  मास्क नसेल तर मंत्रालयात “नो एन्ट्री”