साधूंच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत करण्याची  प्रविण दरेकर यांची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : पालघरमधील गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या सामुदायिक हत्याकांडाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा, तसेच या प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक पध्दतीने करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. तसेच २५ दिवस  उलटूनही या प्रकरणातील प्रमुख हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या राजकीय नेत्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याची जोरदार टीका प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

पालघरमध्ये साधू व त्यांच्या चालकाची निघृणपणे हत्या झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज गडचिंचले गावात घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार मनिषा चौधरी,आमदार सुनिल राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदु पाटील, माजी आमदार पास्कल धनारे उपस्थित होते. घटनास्थळी असेलेले पोलिस उप अधिक्षक सोनावणे यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली, त्यानंतर  पालघरचे पोलिस अधिक्षक देशमुख यांची भेट घेऊन त्यांना या प्रकणासंदर्भात निवेदन सादर केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी सांगितले की,  ही दुर्दैवी घटनेनंतर आपण तातडीने घटनास्थळी जात होतो, परंतु पोलिस व प्रशासनाने चेक नाक्यावर आम्हाला अडवून तेथे जाण्यापासून रोखले. दोन साधू व चालकाच्या सामुदायिक हत्याकांडाची घटना ही महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी आहे अशी टीकेची झोड त्यांनी उठविली.

या हत्येचा तपास ज्या गतीने होऊन या हत्येमागे कोण सूत्रधार होता त्याची माहिती जनेतसमोर येणे गरजेचे आहे. कारण ज्या पध्दतीने समुदयाने एकत्रित येऊन साधूंना ठेचून मारणे हे महाराष्ट्राला भूषावह नाही. म्हणून या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आपण त्याचवेळी केली होती. कारण चौकशी करणारे पोलिस व येथे आक्षेप असणारे पोलिस हे एकच असल्यामुळे हा तपास निपक्षरित्या होऊ शकत नाही म्हणूनच आपण सीबीआय तपासाची मागणी केल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.या प्रकरणी पोलिस अधिक्षक देशमुख यांना निवेदन देण्यात आले असून २५ दिवस उलटूनही या घटनेतील काही प्रश्न अनुत्तरित आल्याचे दरेकर यांनी येथे निर्दशनास आणून दिले.  दरेकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, त्यानुसार जमावाने केलेला हल्ला हा चिथावणीमधून झाला होता व विशिष्ट विचारसरणींच्या माथेफिरूंनी हा कट रचला होता,  अशी चर्चा असताना सरकारकडून या प्रकरणाच्या तपासात आतापर्यत प्रगती दिसत नाही.

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच २५ दिवस उलटूनही हल्ल्यामागील सूत्रधार कोण आहेत हे शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, जमावाने प्रथम पोलिसांना मारहाण केली, मग ही बाब तातडीने पोलिसांनी जिल्हा मुख्यालयाला का कळविण्यात आली नाही, याचेही कारण आम्हाला हवे आहे. त्याचप्रमाणे पालघर पासून गडचिंचले हे ठिकाण एका तासाच्या अंतरावर असताना पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी ५ तास वेळ का लागले. असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत, त्यामुळे या सर्व प्रश्नांची जलदगतीने चौकशी होऊन हे प्रकरण फास्टट्रॅक पध्दतीने चालवावे अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.साधू व चालक यांच्या सामुदायिक हत्येमागे पोलिस व स्थानिक  प्रशासन यामधील जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतानाच घटना घडल्यानंतर गृहमंत्र्यांनी तात्काळ या ठिकाणी येणे गरजेचे होते पण खूपच उशिरा घटनास्थळी येऊन त्यांनी काय साधले हे माहित नसल्याचा टोलाही दरेकर यांनी मारला.

Previous articleविधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार;काँग्रेसकडून एकच उमेदवार
Next articleवाचा : सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा पण कोणाला करता येणार प्रवास