पोलिंसावर हल्ले करणा-यांविरुध्द राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा

मुंबई नगरी टीम

मुंबई :  कोरोनोच्या संकटमय परिस्थितीत पोलिस यंत्रणा आज दिवस-रात्र कोविड योध्दे म्हणून लढत आहे. नागरिकांचे रक्षण करित आहे. राज्याला कोरोनाच्या संकटातून वाचविण्याचा प्रयत्न पोलिस योध्दे करित आहेत. तरीही अशा संकटमय परिस्थितीत जर पोलिस योध्दांवर हल्ले होत असतील तर असे हल्ले करणा-या प्रवृत्तींविरुध्द तात्काळ राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

अँन्टॉप हिल पोलिस ठाण्याच्या पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी आज विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्यासह भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिल सेल्वन, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आदींनी  सहाय्यक पोलिस आयुक्त भारत भोईटे व अँन्टॉप हिल पोलिस  ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रशांत राजे यांची भेट घेतली. पोलिंसावर हल्ले करणा-या प्रवृत्तींविरुध्द राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी त्यांना देण्यात आले.

सध्या कोरोनोसारख्या संकटमय परिस्थितीचे आव्हान सर्वांसमोर आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांच्या घटनांमुळे कोविड योध्दा म्हणून लढणा-या पोलिसांचे मनोबल खचले व त्यांच्यावर हल्ले होत राहिले तर कोरोनोची स्थिती नियंत्रणात आणणे कठिण होईल असे सांगताना दरेकर म्हणाले की, सरकार ही परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील एकाही पोलिसांच्या केसाला धक्का लागणार नाही याची हमी सरकारने आम्हाला द्यावी अन्यथा आताच आम्ही या पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसू असा सक्त इशारा दरेकर यांनी दिला, त्यामुळे अँन्टॉप हिल पोलिस ठाण्याच्या अधिका-यांच्या मार्फत तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संर्पक साधण्यात आला. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी दोन वेळा दरेकर यांच्याशी संर्पक साधला. यापुढे पोलिसांवर हल्ले होणार नाहीत. हल्ले रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तातडीने तयार करण्यात येतील व त्यांच्या संरक्षणाची पूर्ण काळजी सरकार घेईल असे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दरेकर यांना दिले. गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर दरेकर व भाजपचे शिष्टमंडळ पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसले नाहीत.

यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळ जवळ २२५ पोलिसांवर हल्ले झाले. दुर्दैवाने सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि राज्य सरकारचे समाज कटंकाविरुध्दचे नियंत्रण सुटल्यामुळे अशा प्रवृत्ती रोज पोलिसांवर हात उचलण्याचे धाडस करित आहेत. अँटॉप हिल पोलिस ठाण्याच्या पोलिसांवर काल झालेला हल्ला हा अतिशय दुर्दैवी आहे. अश्या प्रकारे जर पोलिसांवर हल्ले होत असतील तर पोलिसांचा धाक व दरारा संपून अराजकता माजेल अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.महाराष्ट्रात कोरोनोची परिस्थितीत नियंत्रणात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे राज्य सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा न करता थेट केंद्र सरकारला मध्यस्थीची विनंती करावी. कारण मुंबईसह राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांचा जीव वाचविण्यासाठी आता राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी. त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शक सूचना घेऊन कृती आराखडा तयार करावा अशी सूचनाही दरेकर यांनी यावेळी दिला. राज्य सरकारने केवळ क्वारांटाईन सेंटर वाढवून तसेच १ हजार, दीड हजार बेडची व्यवस्था करुन चालणार नाही, तर त्यापूर्वीच अशा रुग्णांवर कोरोनाचे नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या आवश्यक वैद्यकीय उपचारासाठी राज्य सरकारने गतीने प्रयत्न केले पाहिजे असेही दरेकर यांनी सांगितले.

Previous articleराज्यात ८८ पोलीस अधिकारी व ७७४ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण
Next articleपॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकार कोणाचे भले करू पाहते आहे ?